सात खलाशांनी 2 तास पोहत गाठला किनारा : पाच ‘वाव’ अंतरामध्ये बुडाली बोट
प्रतिनिधी / गुहागर
जयगडहून मुंबईकडे जाताना बोटीला छीद्र पडून बोटीत पाणी शिरल्याने मुंबई येथील सोमनाथ मच्छीमार बोटीला जलसमाधी मिळाली. ही घटना बुधवारी पहाटे 4.30 वाजता पालशेत जेटीसमोरील समुद्रामध्ये पाच ‘वाव’ अंतरावर घडली. बोट बुडाल्यावर बोटीवरील 7 खलाशांनी तब्बल 2 तास पोहत पालशेत समुद्रकिनारा गाठला. स्थानिक मच्छीमारांनी बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.
बोटीवरील तांडेल राहुल संतोष दाभोळकर, (35, ओणी, ता. दापोली), अक्षय संतोष दाभोळकर, (23), समीर संतोष दाभोळकर, (26), सूर्यकांत शंकर भाटकर, (52 सर्व रा. ओणी, ता. दापोली), जगदीश जगन्नाथ चिवेलकर, (29), भरत लक्ष्मण भोमे, (31) व हरेश शंकर पाचकुडे (30 सर्व रा. त्रिशुल साखरी, गुरववाडी, ता. गुहागर) अशी वाचलेल्या 7 खलाशांची नावे आहेत.
मुंबई, माहुल येथील नितीन नथुराम मुंडे यांच्या मालकीची फायबरची मच्नछीमार बोट मध्यंतरीच्या वादळामुळे तवसाळच्या जयगड खाडीत आसऱयाला होती. ही बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने जात होती. बोट समुद्रातून जात असताना पहाटे 3.30च्या दरम्यान बोटीचा वेग मंदावला म्हणून खलाशांनी बोटीची तपासणी केली असता इंजिनच्या खालच्या बाजूने बोटीत पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे खोल समुद्रातून जाणारी बोट तातडीने किनाऱयावर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पालशेत जेटीपर्यंत पोहचण्याअगोदरच 5 वाव अंतरावर बोट पाण्यात बुडाली. बोट बुडत असताना 7 खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. यातील ओणीतील 4 खलाशांना पोहता येत होते, तर त्रिशुल साखरी येथील तिघांना पोहता येत नव्हते. यामुळे त्या तिघांना बोटीवरील संरक्षक साहित्य बांधून बरोबर घेत चौघांनी पोहण्यास सुरूवात केली. समुद्रात पाण्याला असलेल्या करंटमुळे तब्बल 2 तासाने 7 च्या सुमारास या खलाशांनी पालशेत समुद्रकिनारा गाठला.
पालशेत समुद्रकिनारी स्थानिकांना त्यांना आधार दिला. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी ही बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. या घटनेची माहिती गुहागर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष माने, उपनिरीक्षक किरणकुमार कदम, संतोष साळस्कर, शैलेश वनगे, सचिन पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद घेऊन त्या 7 खलाशांना घरी पाठवण्यात आले.