वातावरणात गारवा वाढला
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनात आता गुलाबी थंडीला सुरूवात झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. उकाडा कमी होवून गारवा निर्माण झाला आहे. थंडीचा जोर वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटु लागल्या आहेत. शनिवारी साताऱयाचे तापमान 29 अंश सेल्शिअस इतके होते.
दिवाळी अवघ्या 6 दिवसांवर आली असून दिवाळीनंतर थंडीला सूरूवात होते. मात्र दिवाळीपूर्वीच तापमानाचा पारा घसरू लागला आहे. गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कडक ऊन पडल्याने उकाडा जाणवत होता. तोच थंडीला सुरूवात होवून पारा घसरला आहे. पहाटे दव पडत असून सर्वत्र धुक्यांची चादर पसरत आहे. दिवसाही हवेत गारवा निर्माण झाला आहे. सायंकाळी 6 नंतर लहान मुले, जेष्ठ मंडळी घराबाहेर न पडता घरात राहणे पसंत करत आहेत. शहरातील सगळे रस्ते सामसूम होवू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत. उबदार कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. परिणामी स्वेटर, जर्कीन, कानटोपी, मफलर अशा उबदार कपडय़ांना मागणी वाढली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामुळे कोमट पाणी पिणे, थंड, आंबट, तेलकट पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. थंडी पडू लागल्याने गहू, हरबरा आदी रब्बी हंगामातील पिकांसाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.