बंद दाराआड 50 मिनिटांपर्यंत झाली चर्चा
वृत्तसंस्था / धर्मशाळा
हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील 5 दिवसीय दौऱयावर असलेले सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांची मॅक्लोडगंज येथे भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सुमारे 50 मिनिटांपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली आहे. बौद्ध धर्मगुरु आणि सरसंघचालकांच्या भेटीला अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जातेय.
दलाई लामा हे तिबेटचे धर्मगुरु आहेत. दलाई लामा यांनी कोरोना काळात घेतलेली ही दुसरीच भेट आहे. चालू महिन्यात त्यांनी स्वतःचे अनुयायी आणि बौद्ध भिक्षूंना भेटण्यास सुरुवात केली होती.
सरसंघचालक भागवत आणि तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांच्यात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. विश्वशांती आणि संघर्षापासून मुक्त करण्यासाठी भारत धार्मिक सलोख्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सद्यकाळात विश्वशांतीची गरज असल्याचे पूर्ण जगाला समजून घ्यावे लागेल. जगातील विस्तारवाद रोखत स्वातंत्र्याचा सन्मान केला जावा असे दलाई लामा यांनी या चर्चेदरम्यान म्हटले असल्याची माहिती संघ नेते इंद्रेश कुमार यांनी दिली आहे.
आमची भारतीय संस्कृती समावेशक असून ती सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करते. धार्मिक सौहार्दाचे सर्वोत्तम मॉडेल भारतच आहे. तिबेट आमचा बंधू देश असल्याने आम्ही तिबेटच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहिलो आहोत आणि राहू असे भागवत यांनी नमूद केल्याचे इंद्रेश कुमार यांच्याकडून सांगण्यात आले.
दलाई लामा आणि भागवत यांच्या भेटीदरम्यान तेथे उपस्थित नव्हतो. पण दोघांमध्ये मानवता आणि धार्मिक मुद्दय़ांवर चर्चा झाली आहे. भारताचे तिबेटला सातत्याने सहकार्य मिळत आल्याचे उद्गार तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख पेम्पा छेरिंग यांनी काढले आहेत.