- ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, नागरिकांना नियमांचा विसर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपासून कडक निर्बंध लावल्यानंतर ही मुंबईत ‘जैसे थे’ परिस्थिती पाहायला मिळते आहे.
सोमवारी सकाळी दादरमधील भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी मास्क देखील घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करताना दिसत नव्हते. एकीकडे पालिकेकडून देखील कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहे. दिवसा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत जमावबंदी लागू असेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र या नियमांमुळेच आज दादरच्या भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेस गर्दी दिसून आली.
दरम्यान, काल मुंबईमध्ये कोरोनाचे तब्बल 11,163 नवे रुग्ण आढळून आले. तर 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 52 हजार 445 वर पोहचली आहे. सद्य स्थितीत 68 हजार 052 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एवढी भयानक परिस्थिती असून देखील मुंबईकर नियमांचे पालन करताना दिसत नाही आहेत. यावर आता मुंबई महापालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.