अफवा पसरविणाऱया 57 जणांना पोलिसांकडून अटक : आयबी अधिकाऱयाच्या कुटुंबाला 1 कोटीची आर्थिक मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढून 47 वर पोहोचला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 334 गुन्हे नोंदविले आहेत. यातील 44 गुन्हे शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित आहेत. तर एकूण 57 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 33 जणांवर दंगलीत सामील असल्याचा आरोप आहे. याचबरोबर 800 हून अधिक जणांना ताब्यात घेत पोलिसांनी हिंसाचाराची चौकशी चालविली आहे.
अफवांचे सत्र पाहता पोलिसांनी सोमवारी सकाळी हिंसाचारग्रस्त भागांमध्ये ध्वजसंचलन केले आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारात जीव गमाविणारे इंटेलिजेन्स ब्युरोचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच शर्मा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला दिल्ली सरकार नोकरी देणार आहे. तर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हिंसाग्रस्त भागाचा दौरा केला आहे.
कडेकोट सुरक्षेत परिक्षेस प्रारंभ
सीबीएसईच्या परिक्षांना सोमवारी वेळापत्रकानुसार प्रारंभ झाला आहे. हिंसाचारग्रस्त भागांमधील विद्यार्थीही परिक्षेला सामोरे गेले आहेत. तेथील परीक्षा केंद्रांवर 98 टक्के विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळांच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुष्प देत पोलिसांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
9 सदस्यीय समिती
हिंसाचारग्रस्त भागांमध्ये शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली विधानसभेने 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षत्व आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज करणार आहेत.
समाजकंटकांकडून अफवा
काही समाजकंटक शांतता-सुव्यवस्था अडचणीत येईल अशाप्रकारच्या अफवा पसरवित आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. पूर्ण दिल्लीमध्ये कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात असून नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीचे पालन करत शांतता प्रस्थापित करण्यास मदत करावी, असे आवाहन दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एम.एस. रंधावा यांनी केले
आहे.
हिंसाचारावरून संसदेत गदारोळ
दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्दय़ावरील राजकारण आता संसदेत पोहोचले आहे. संसदेत काँग्रेसकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस खासदारांचा गोंधळ वाढल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज तहकूब करावे लागले आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत घोषणाबाजी केल्याने भाजपच्या सदस्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीतील हिंसाचारावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. केंद्र सरकार दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यास इच्छुक नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, पण कुणीही या मुद्दय़ाचे राजकारण करू नये, असे विधान संसदीय कामकाज राज्यमंत्री मेघवाल यांनी केले आहे.
ताहिर हुसैनच्या घरात
ऍसिडचा मोठा साठा
आम आदमी पक्षातून निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनच्या घरातून मोठय़ा प्रमाणात सल्फ्युरिक ऍसिड प्राप्त झाले आहे. या ऍसिडच्या ड्रमवर गंगाजल असे नमूद होते. या ऍसिडमुळे काही सेकंदातच त्वचेसह शरीरातील अवयवही जळू शकतात. हे ऍसिड सर्वसाधारणपणे कारखान्यांमये वापरले जाते. तसेच ते परवाना, आधारकार्ड किंवा योग्य कारणाशिवाय उपलब्ध होत नाही. ताहिरच्या घरात ऍसिड पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले होते. ताहिर अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.