क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज वेगळेच वळण मिळत असून भाजप नेते मोहित कंबोज आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे नाव आता या प्रकरणात आले आहे.राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खंडणीसाठीच आर्यन खानचे अपहरण करण्यात आले असून वेळोवेळी अजून काही गौप्यस्फोट आपण करणार असल्याचे सांगितल्याने दिवाळी आधी सुरू झालेली ही राजकीय फटाकेबाजी दिवाळीनंतरही सुरू असून ती कधी संपणार हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.
गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेले क्रुझ ड्रग पार्टी प्रकरण हे आता देशव्यापी प्रकरण झाले असून या प्रकरणात रोज नव नवीन माणसांची एंट्री होत आहे. एनसीबीचे अधिकारी सुनिल वानखेडे यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱया या प्रकरणात आता राजकीय व्यक्तींचे लागेबांधे असल्याचे उघड होत असल्याने आता राष्ट्रवादीविरूध्द भाजप असा सामना होताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनाही या पार्टीचे निमंत्रण असल्याचे मलिक यांनी सांगितले. त्यातच कंबोज यांनी दोनच दिवसापूर्वी ड्रग्ज रॅकेट या सरकारमधील एक मंत्री चालवत असल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे ? अद्याप समोर आलेले नाही. कंबोज यांनी सुनिल पाटील हे राष्ट्रवादीचे धुळ्य़ाचे कार्यकर्ते असून पाटील हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप केला आहे तर मलिक यांनी भाजप नेते मोहित कंबोज हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी गृहखात्यातील बदल्या, फोन टॅपिंग प्रकरण आणि 100 कोटीची वसुली या प्रकरणानंतर एकीकडे गृहखात्याच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून माजी गृहमंत्री सध्या तुरूंगात आहेत, तर पोलीस अधिकारी परमबीर सिंग हे फरार आहेत. आता एनसीबीवर होत असलेल्या आरोपानंतर लोकांनी कुठल्या तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. आज उद्योगपती तसेच मोठे व्यावसायिक हे कधी काळी गुंडांकडून प्रोटेक्शन मनीसाठी होणाऱया मागणीपासून भयभीत होते. आता मात्र ऍटलीना अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांच्या गाडी नंतर आणि आर्यन खान प्रकरणानंतर आता उद्योजक आणि व्यापारी चिंतेत आहेत.
रविवारी मलिक यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना या पार्टीचे निमंत्रण असल्याचा गौप्यस्फोट करताना काही राजकारण्यांच्या मुलांना या पार्टीत नेऊन उडता पंजाबसारखी उडता महाराष्ट्र करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप केला. पालकमंत्री अस्लम शेख यांनी मात्र आपल्याला या पार्टीचे निमंत्रण होते, मात्र आपण काशिफ खानला ओळखत नसल्याचे सांगितले. आपल्याला अनेक कार्यक्रमाचे निमंत्रण येत असते जर या पार्टीमागे काही षडयंत्र असेल तर त्याचा तपास यंत्रणांनी करावा असे शेख यांनी म्हटले मात्र जर तसे काही षडयंत्र असेल तर हे नक्कीच भयंकर आहे. यापूर्वीच मलिक आणि नाना पटोले यांनी काही लोक हे मुंबईची बदनामी करत असून मुंबईतील इतर उद्योग जसे हळुहळू महाराष्ट्राबाहेर हलविले तसे मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करून फिल्मसिटी बाहेर नेण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप करताना मुंबईचे महत्व कमी करण्याचे कारस्थान सुरू असल्याचे म्हटले होते. कधी काळी स्कॉटलँड पोलिसांशी तुलना केल्या जाणाऱया मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी 100 कोटी वसुली आरोपी प्रकरणात झाली. आता या ड्रग्ज प्रकरणातही मुंबईचीच बदनामी होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जो पहिल्या दिवसापासून संघर्ष सुरू आहे, तो बघता आत्तापर्यंत एक मंत्री तुरूंगात तर एक मंत्री घरी गेला आहे. राज्य विरूध्द केंद्र हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच असून यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज आर्यन खान प्रकरणात देखील राष्ट्रवादी विरूध्द भाजप असे एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. भाजपचे नेते जे.पी.नड्डा यांनी तर महाराष्ट्रातील सरकार उखडून टाकण्याची भाषा केली आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणूकीत भाजपचा पराभव झाला त्यात महाराष्ट्रातील देगुलर विधानसभेचा देखील समावेश होता, येथे काँग्रेस पक्ष (महाविकास आघाडीने) भाजपच्या उमेदवाराचा दारूण पराभव केला, आणि इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणूकीतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. इतर राज्यात जरी भाजपची कोणा ना कोणाशी युती असली तरी महाराष्ट्रात भाजप विरूध्द तीन महत्वाचे पक्ष असाच सामना यापुढे पहायला मिळणार. भाजपला अप्रत्यक्ष मदत करणाऱया वंचितला देखील लोकांनी चांगलेच नाकारले. वंचितचा उमेदवार चालला नाही, म्हणून भाजपचा उमेदवार पडला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली. कालच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जे स्वतः भाजपच्या कोटय़ातून खासदार आणि मंत्री आहेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी मत खाण्यापेक्षा सत्तेचे राजकारण करण्याचा सल्ला दिला आहे. एक मात्र नक्की राज्यातील राजकारणात सत्ताधारी पक्ष हे कुठल्याही परिस्थितीत सत्ता टिकवण्यात तर विरोधक सरकार पाडण्यात मश्गुल असल्याचे बघायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱयांचा आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन सणासुदीच्या काळात संप सुरू आहे. मात्र अद्याप हा संप मागे घेण्यात आलेला नाही. एकीकडे क्रुझ ड्रग्ज प्रकरणात रोज सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधीपक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, गौप्यस्फोट करण्यात मश्गुल असताना एसटी कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी जो संप पुकारला आहे, त्याबाबत अद्याप काही ठोस निर्णय होताना दिसत नाही. पूर्वी किमान न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर तरी यंत्रणा त्याचं पालन करत असत. मात्र गेल्या काही दिवसात न्यायालयाच्या निर्णयाला देखील बगल देण्याची एक पध्दत आता सुरू झाली आहे. कोणाचा कोणाला धाक राहिलेला नाही. आता क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील प्रकरणात दिवाळी संपल्यानंतरही रोज एकमेकांवर फटाके फोडले जात आहेत. रोज नवीन मास्टर माईंड म्हणून कोणा कोणाची नावे येत असताना याचा नेमका मास्टर माईंड कोण? हे समोर येणे गरजेचे आहे.
प्रवीण काळे