वार्ताहर/ एकंबे
भाडळे खोऱयातील बोधेवाडी घाटामध्ये सोमवारी रात्री झालेल्या खुनाचा उलगडा कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी केला आहे. सुमित मोरे याने कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी आणि दीड कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ घेण्यासाठी आपला मित्र तानाजी बाबा आवळे याचा खून केला. त्यानंतर मित्रांच्या सहाय्याने तो मृतदेह आणि गाडी पेटवून दिली. एकूणच सुमित मोरे याने दीड कोटी रुपयांसाठी स्वत:च्या खुनाचा बनाव केला असून, त्याला जेजुरी येथून अटक करण्यात आली आहे. या गुह्यात आणखी दोघा-तिघांचा सहभाग असून, त्यांनाही लवकरच जेरबंद केले जाणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की बोधेवाडीनजिकच्या पिराच्या घाटात खून झालेली व्यक्ती ही सुमित मोरे नसून, तानाजी बाबा आवळे आहे. सुमित मोरे याने मास्टरमाईंड होत दीड कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या अमिषातून आपला जीवलग मित्र तानाजी आवळे याचा अत्यंत निर्दयीपणे खून केला व मृत झालेली व्यक्ती ही सुमित मोरे आहे, हे लोकांना समजून यावे, यासाठी स्वत:ची मारुती कार देखील पेटवून दिली. पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा पर्दाफाश केला असून, सुमित मोरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला रितसर अटक करण्यात आली आहे.
सुमित मोरे हा अत्यंत हुशार आहे. मुंबईतील प्रोटीन व्यवसायात त्याला नुकसान झाले होते, त्यामुळे कर्ज देखील वाढले होते. या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने आयसीआयसीआय बँकेकडून दीड कोटी रुपयांचा विमा उतरविला होता. स्वत:चा अपघाती मृत्यु घडवून विम्याचे पैसे मिळवून, मुंबईतून पलायन करण्याचा सुमित मोरे याचा विचार होता. त्यामुळे अपघाती मृत्यु घडविण्याच्या हेतूने तो सातत्याने दहिवडी परिसरात येत होता.
आपल्या काही खास आणि जवळच्या मित्रांना त्याने प्लॅन बोलून दाखविला, त्यामध्ये बराच खल झाल्यानंतर स्वत: सारखा हुबेहूब दिसणाऱया व्यक्तीचा शोध सुमितने सुरु केला होता आणि त्याची नजर निढळ येथे टेलरिंग व्यवसाय करणाऱया तानाजी बाबा आवळे याच्यावर गेली. तानाजी हा मित्र असल्याने सुमितने त्याच्यासोबत सलगी वाढवली. त्याला सतत बरोबर घेऊ लागला. अखेरीस तानाजी याचा गेम करायचा, असे म्हणून सोमवारी त्याने तानाजीला अमिष दाखवून दहिवडीत बोलावून घेतले. आपल्याला गावाला जायचे आहे, असे सांगून त्याला बरोबर घेतले. त्यानंतर त्याच्या डोक्यात स्टंप मारुन, त्याला जागीच मारले. प्लॅनप्रमाणे पिराच्या घाटात त्याचा मृतदेह पेटवून दिला आणि स्वत:ची गाडी देखील पेटविली.
या गुह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर मोरे कुटुंबियांचे आणि त्यांच्या नातलगांचे वागणे काहीच बदलले नव्हते, त्यांच्या चेहऱयावर कोठेही दु:खाची छाया दिसत नव्हती. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत वेळकाढूपणा देखील पोलिसांनी ओळखला. दरम्यानच्या काळात रजेवर असलेले पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड हे घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ रुजू झाले. त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह वेगवेगळ्या टीम तयार करुन तपासाला गती दिली. सुमित मोरे याच्या भावावर लक्ष केंद्रीत करण्यात आले, तो सातत्याने विसंगत माहिती देत असल्याने, त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला आणि त्याने घटनेची उकल केली.
जेजुरी (ता. पुरंदर) येथे सुमित मोरे हा लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच, त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याला रितसर अटक करण्यात आली. अवघ्या चार दिवसात हा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी सुमित मोरे याचे खरे रुप समाजाला दाखवून दिले आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि स्वप्निल घोंगडे, विश्वजित घोडके, मोहन तलवार व पाटील यांच्यासह सहाय्यक फौजदार घोरपडे, शंकर गुजर, हवालदार विलास यादव, नितीन भोसले, केंजळे, सचिन जगताप, तुषार आडके, उमेश गहीण, गंबरे, विजय खाडे, ज्ञानेश्वर यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.