नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना नागरिकांनी कोरोना लसीकरण करणे आवश्यक बनले आहे. पण असा कोरोनाचा फैलाव वाढत असताना देशात अनेक ठिकाणी लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. तसेच जगभरातील प्रसारमाध्यमे भारताच्या ढीसाळ नियोजनावर बोट ठेवत आहेत. काही दिवसापूर्वी केंद्राने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी अॅडजेक्टिव्ह आणि अॅडवर्बचं उदाहरण देत करोना लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. “भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल.” असं राहुल गांधी यांनी ट्विट करत, सोबत #vaccine असं देखील जोडलं आहे.
महाराष्ट्राने १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १ मे पासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.