नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला बळकट करताना भारताने मोठी झेप घेतलेली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत लाभार्थींना 90 कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले आहेत. एकूण लाभार्थींपैकी 24 कोटी लोकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. भारताने लसीकरण मोहिमेत केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी भारताने एकूण 90 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी केली. यावेळी त्यांनी ‘जय अनुसंधान’चा नारा देत हा महत्त्वाचा टप्पा पार करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. भारतात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिटय़ूटच्या कोव्हिशिल्डच्या माध्यमातून वेगाने लसीकरण सुरू आहे.