कृष्ण रुक्मीची विटंबना करत होता त्यावेळी इकडे बलरामाने व यादव सैन्याने हत्तीने कमलवन उद्ध्वस्त करावे तसे रुक्मीचे सैन्य उद्ध्वस्त केले. नंतर बलरामदादा कृष्णापाशी आले. त्यांनी त्या रुक्मीला केविलवाण्या अवस्थेत पाहिले. रुक्मी अपमानाने अधोमुख झाला होता. बलरामाला त्याची दया आली.
सोडोनियां गळबंधन । कृष्णासी म्हणे हे बुद्धि कोण । सोयरियांसी विरूपकरण । तें निंद्य जाण आम्हांसी ।
शरीरसंबंधासी विरूपबाधू । हा तंव वधाहूनि अधिक वधू । तुवां थोर केला अपराधू । सुहृदसंबंधू लाजविला । याचा वध तूं करितासी ।
तरी हा पावत निजसुखासी । मान देऊनि सोडितासी । सोयरिकेसी श्लाघ्यता । क्षत्रिय सांपडे रणसांकडी । त्यासी द्यावीं लेणीं लुगडीं ।
युद्धी खांडमिशी बोडी । हे अपरवडी त्वां केली ।
बलरामदादाने धावत येऊन रुक्मीला बंधमुक्त केला व कृष्णाला म्हणाला-कृष्णा! ही कोणाची बुद्धी? सोयऱयाचे विरूपकरण तू केलेस, हे योग्य नाही. आपल्या नातेवाईकाचे विरुपकरण करणे हे आपल्याला शोभत नाही. हा तर वधापेक्षा मोठा वध तू केलास. यामुळे आपल्या नातेसंबंधाला तू कमीपणा आणलास. याचा तू वध केला असतास तर याला मोक्ष प्राप्त झाला असता किंवा याला सन्मानाने जीवदान देऊन सोडून द्यायला हवे होतेस. क्षत्रिय रणात सापडला तर त्याचा अपमान करण्यासाठी त्याला लेणी लुगडी द्यावी, हे पुरेसे आहे. पण तू याच्या मिशा काढल्यास, हे योग्य नाही.
सवेंचि म्हणे रुक्मिणीसी । दोष न ठेवावा आम्हासी । जो कर्में करी जैसीं । फळें तैसी तो भोगी ।
कृष्ण निजतत्त्व तत्त्वतां । कर्मे करूनि अकर्ता ।
बंधुवैरुप्याचा दाता । नव्हे सर्वथा श्रीकृष्ण ।
तुया बंधूचें जें वैरुप्य । तें त्याचें त्यास फळलें पाप ।
हेंचि जाणोनि भोगाचें निजरूप ।
सांडी रोष सर्वथा। येथें कर्ता तोचि भोक्ता । ऐसी कर्ममर्यादा तत्त्वतां ।
बोल न ठेवीं कृष्णनाथा। हृदयी व्यथा न धरावी ।
याचवेळी रुक्मिणीची समजूत घालण्याकरिता बलरामदादा तिला म्हणाले – रुक्मिणी! आम्हाला दोष देऊ नकोस. जो जसे कर्म करतो तसे फळ त्याला भोगावे लागते. कृष्ण स्वतः निजतत्त्व परमात्मा आहे. कर्म करून तो अकर्ता आहे. तुझ्या बंधूच्या विरूपतेचा दाता कृष्ण नाही. तुझ्या बंधुची विरुपता हे त्याचे पापच त्याला भोवले आहे. ते भोगूनच संपवावे लागेल. म्हणून रुक्मिणी, तू आमच्यावर राग धरू नकोस. इथे कर्ता तोच भोक्ता अशी कर्ममार्गाची मर्यादा आहे. त्यामुळे तू कृष्णावर राग धरू नकोस.
सवेंची म्हणे श्रीकृष्णासी । रणीं विटंबू नये सुहृदासी । बोल लागला क्षत्रियधर्मासी ।
हृषीकेशी हें अनुचित । दंडा योग्य जरी अपराधू । तरी दंडुं नये सोयरा बंधू । दंडापरीस अधिक बाधू । न मारूनि वधू तुवां केला ।