वृत्तसंस्था/ कोलंबो
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ 18 जुलैपासून सुरू होणाऱया वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने लंकेच्या दौऱयावर भारताचा दुय्यम संघ पाठविला असून या संघात अनेक नवोदितांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहील. कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रमुख संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी दाखल झाला आहे.
लंकेच्या दौऱयात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या मालिकांच्या कार्यक्रमामध्ये कोरोना समस्येमुळे फेरबदल करण्यात आला. 13 जुलैपासून खेळविली जाणारी वनडे मालिका आता पाच दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. लंकन संघातील दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळानी या मालिकांच्या तारखेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघातील खेळाडू सरावावर अधिक भर देत असून त्यांची एसएससी मैदानावर सरावाची सोय करण्यात आली आहे. भुवनेश्वरकुमारकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडचे या संघाला बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. 18, 20, 23 जुलै रोजी वनडे सामने तर 25, 27 आणि 29 जुलै रोजी टी-20 सामने होणार आहेत.