इमारत कोसळून अनर्थ घडण्यापूर्वीच मनपाने हटविण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
खडेबाजार, गणपत गल्ली कॉर्नरजवळ इमारत कोसळत असल्याची तक्रार करण्यात आली होती. सदर इमारत कोसळत असतानाही मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. धोकादायक इमारतीची तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे अधिकारी कारवाई करण्यास हतबल झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर इमारत कोसळून अनर्थ घडल्यानंतर मनपाच्या अधिकाऱयांना जाग येणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
शहरात असंख्य जीर्ण झालेली घरे असून धोकादायक इमारतींबाबत कोणतीच नोंद महापालिका प्रशासनाकडे नाही. वास्तविक, शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून नोंद ठेवणे आवश्यक आहे. धोका टाळण्यासाठी अशा इमारती हटविण्याकरिता इमारतधारकांना नोटीस बजाविण्याची गरज आहे.
पण महापालिका प्रशासनाचे अधिकारी याबाबत कोणतीच कार्यवाही करीत नाहीत. धोकादायक इमारतींबाबत माहिती विचारली असता महापालिका कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, धोकादायक इमारतींसंदर्भात तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. पावसामुळे अशा अनेक धोकादायक इमारती कोसळत आहेत. पण काही ठिकाणी नागरिकांना याचा फटका बसत
आहे.
एखादी भिंत कोसळल्यानंतर तेथील रहिवासी अन्यत्र स्थलांतर करतात. पण इमारतीचा भाग कोसळेपर्यंत कोणतीच दखल घेतली जात नाही.
अन्य इमारतींनादेखील धोका
महापालिका कार्यक्षेत्रात अशा अनेक धोकादायक इमारती पावसाळय़ात कोसळत असतात. खडेबाजार परिसरात पंधरा दिवसांपूर्वी एक इमारत भुईसपाट झाली होती. याची धास्ती घेऊन खडेबाजार, गणपत गल्ली कॉर्नर येथील जीर्ण झालेल्या इमारतीबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. या ठिकाणी सहकारी संस्था असलेली इमारत कोसळण्याच्या मार्गावर असल्याने धोका निर्माण झाला आहे. या परिसरात काही फेरीवाले व्यवसाय थाटतात. शेजारी काही व्यावसायिक दुकाने आहेत.
सदर इमारत कोसळल्यास अन्य इमारतींनादेखील धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या शेजारच्या घरात वृद्ध महिला राहते. त्यामुळे या सर्वांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत सातत्याने तक्रार करून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. सदर इमारत कोसळून अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत का, असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. इमारत कोसळून अनर्थ घडण्यापूर्वीच इमारत हटविण्यासाठी महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत
आहे.