सातारा / प्रतिनिधी :
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सातारा शहर आणि सातारा तालुका यांच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी, सातारा यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.
राज्यातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे, हा राष्ट्राच्याही सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत भारतीय जनता पार्टी तर्फे निदर्शने केली जातील, आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार वठणीवर आणण्यासाठी आम्ही मोठा लढा उभारून तडीस नेण्यासाठी कटिबद्ध आहोत. १९९३ च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि राष्ट्रावर पुन्हा संकट येऊ नये यासाठी आतंकवादी विचारसरणीला पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात राज्यभर आंदोलने करणार आहोत, या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अन्यथा जनसामान्यांच्या होणाऱ्या उद्रेकास राज्यशासन जबाबदार राहील.
या वेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, तालूका सरचिटणीस गणेश पालखे, युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे, शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.