24 तासांमध्ये 28,592 रुग्ण, 338 मृत्यू
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शनिवार ते रविवार या चोवीस तासांमध्ये देशभरात नव्या 28,592 रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,84,921 पर्यंत खाली आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 6,595 ची घट झाली. ही माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
एकंदर बाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.16 टक्के आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण 97.51 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आजपर्यंत भारतात एकंदर कोरोना रुग्णांची संख्या 3,32,36,921 इतकी असून एकंदर मृत्यूंची संख्या 4,42,655 इतकी आहे. अद्यापही सर्वाधिक नवी रुग्णसंख्या केरळमध्येच नोंद झाली असून गेल्या दोन आठवडय़ांचा विचार करता एकंदर नव्या रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण याच राज्यग्नातील आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे.
दिल्लीत नवी रुग्णसंख्या आता प्रतिदिन 50 च्या खाली आली आहे. आंध्र प्रदेशने एकंदर रुग्णसंख्येच्या संदर्भात 20 लाखाची पातळी ओलांडली आहे. दुसरा उद्रेक आता हळूहळू नियंत्रणात येत असला तरी तो संपलेला नाही. तसेच निष्काळजीपणा केल्यास तिसरा उद्रेकही होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि सर्वसामान्य जनतेनेही दक्षता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने पुन्हा स्पष्ट केले. भारताचे लसीकरण अभियान जोमाने सुरु असून ज्यांना लसीची किमान एक मात्रा (डोस) मिळालेला आहे, त्यांची संख्या 74 कोटींच्या वर गेली आहे. तर दोन मात्रा मिळालेल्यांची संख्या 15 कोटींहून अधिक झाली आहे. वर्षअखेरपर्यंत पूर्ण भारताचे लसीकरण होणार आहे.