पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
21 व्या शतकातील नव्या भारताचा पाया रचणे हे नव्या शिक्षण धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याच अनुषंगाने कौशल्य विकास कार्यक्रमांवर भर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी नव्या शिक्षण धोरणासंबंधी सरकारची बाजू स्पष्टपणे मांडली.
देशाची शिक्षण व्यवस्था आपल्या वर्तमान आणि येणाऱया पिढय़ांना भविष्यासाठी तयार करत असते. 21 व्या शतकातील नव्या भारताचा पाया रचण्याचे काम हे नवे शिक्षण धोरण करणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मागील तीन-चार वर्षे चाललेल्या वैचारिक मंथनानंतर नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. वेगवेगळय़ा विचारधारांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. आता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार प्रत्येकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार आतापासूनच कामाला लागलेले आहे. हे शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी जी मदत हवी असेल ती केली जाईल. मी तुमच्यासोबत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.
कौशल्यपूरक शिक्षणामुळे देशविकास शक्य
शैक्षणिक धोरणांमध्ये देशाच्या लक्ष्यांना विचारात घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यातील पिढी तयार करता येईल. हे शैक्षणिक धोरण नव्या भारताची पायाभरणी करेल. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्यपूरक ज्ञान प्राप्त झाल्यास तरुण पिढी उत्तुंग भरारी घेऊ शकेल. परिणाम वैयक्तिक विकासाबरोबरच देशविकासही शक्य होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.