सार्वजनिक स्थळी नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष : सामाजिक अंतराचे भान, मास्क-सॅनिटायझर्सचा वापर आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटात त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे सक्तीचे आहे. मात्र ना कोरोनाची भीती, ना दंडाची, अशा आविर्भावात नागरिकांकडून कोविड-19 ची मार्गदर्शकप्रणाली पायदळी तुडविली जात आहे. कोरोनाचे संकट धुसर होत असले तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र, अनलॉकच्या विविध टप्प्यात व्यवहार सुरळीतपणे सुरू असताना नागरिकांकडून सुरक्षिततेच्यादृष्टीने दुर्लक्ष केले जात आहे.
कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी मास्कची सक्ती, सामाजिक अंतराचे भान आणि सॅनिटायझर्सचा वापर सक्तीचा आहे. शिवाय गरजेशिवाय घरातून बाहेर न पडणे योग्य आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱयांकडून दंडाची रक्कम आकारली जात असल्याने ती टाळण्यासाठी तात्पुरता मास्क अथवा रुमाल लावून वेळ मारून नेली जात आहे. तोंडाचा मास्क हनुवटीला लावून बाजारपेठेत फिरणे अथवा परस्परांशी गप्पा मारणे, असे प्रकार पहायला मिळत असून यामुळे ना कोरोनाची भीती, ना दंडाची पर्वा नसल्याचेच यातून अनुभवायला मिळत आहे.
सार्वजनिक स्थळी सामाजिक अंतराचा फज्जा उडत असून ना सॅनिटायझर्सचा वापर, ना मास्क असेच चित्र पहायला मिळत आहे. बाजारपेठा, बसस्थानके, धार्मिकस्थळे तसेच इतर सार्वजनिक स्थळी नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होत नाही. परिणामी शिस्त लावणाऱया पोलीस प्रशासनाच्या भीतीपोटी केवळ नियम पाळत असल्याचे भासविले जात आहे. यामुळे कोरोनाच्या संकटाला स्वतःच आमंत्रण देण्याचा प्रकार घडत आहे. दक्षतेच्यादृष्टीने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.