आपुलकीच्या नात्याची साक्ष देणारा-परस्परातील प्रेम वृद्धिंगत करणारा सण
प्रतिनिधी/ बेळगाव
रक्षाबंधन… खरंच !!! शब्दातच किती प्रेम, जिव्हाळा, जबाबदारी, अन् एक आगळय़ावेगळय़ा परस्पर आपुलकीच्या नात्याची साक्ष देणारा हा सण…
लक्ष्मणराव रविवार असल्यामुळे निवांत माळय़ाबरोबर बागेत काम करत होते… तेवढय़ात त्यांना घरातून पवन व अंजलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला… रोजचीच मुलांची मस्ती, म्हणून ते हसून दुर्लक्ष करणार तोच दोन्ही मुले पळत आजोबा तुम्ही सांगा ना म्हणत बागेत आली…
बोला बोला काय वादविवाद करताय…. हसत लक्ष्मणरावांनी विचारले. आजोबा रक्षाबंधन म्हणजे काय? पवन ने सांगायला सुरुवात केली… तुला माहीत नाही… मी तुला लहानपणी हुमायुराजाची गोष्ट सांगितली होती ना, विसरलात का? आजोबांनी विचारले. मी नाही, ही विसरलीय तो अंजलीकडे पाहत म्हणाला… लक्ष्मणराव अंजलीला विचारणार तोच ती स्पष्टीकरण देऊ लागली.
आजोबा ती तर पुराणातील गोष्ट आहे ना. आता तर सगळं किती बदललं आहे ना. परिस्थिती, समस्यांच स्वरूप, विचारसरणी सगळच. मग सणही नकोत का नवीन उद्देश व अर्थ डोळय़ासमोर ठेवून साजरे करायला… सण, परंपरा तीच परंतु दृष्टिकोन बदलायला हावा… भावाने रक्षा करावी म्हणून बहीण राखी बांधते हे मला तितकसं पटत नाही. तुला बाबा रागावू नये म्हणून कितीदा मी तुला त्यांच्या रागापासून वाचवलं, शाळेत तुला कितीदा शिक्षा होऊ नये म्हणून तुझा गृहपाठ केला… मग मी पण तर तुझी रक्षाच केली ना?
पवन काही तरी बोलणार तोच आजोबा, त्याला थांबवत, तिच्या या नवीन विचाराने लक्ष्मणराव स्तब्ध झाले. व आताच्या व अगोदरच्या परिस्थितीचा हिशेब मांडू लागले…
साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट लक्ष्मणराव विचार करत होते. त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरांनी अर्जंट बायपास करायला सांगितले होते….त्यावेळी तो खर्चही न करता येणारा होता.. कमावता मी एकटा.. नोकरीपेशा… त्यावेळी माझी लहान बहीण आली… तिच्याकडून काही लपलेल नव्हत पण मी तिला काही मागितलही नव्हतं. तिने आपल्या दागिन्यांचा डबा माझ्यासमोर धरला, दादा हे घे, औषध उपचारांच्या बाबतीत कुठलीही हयगय व्हायला नको.. मी नको म्हणत असताना, ती म्हणाली दागिने वस्तू आहेत. परत केव्हाही घेता येईल पण माझ्या माहेरच्या अर्ध्या शरीरालाच काय झाल तर या दागिन्यांचा काय उपयोग? जणू काय रक्षाबंधनच्या दिलेल्या वचनाच ती पालन करत होती… मला जी गोष्ट आज उमगली माझ्या बहिणीने ती वीस वर्षांपूर्वी करून पण टाकली…. आजोबा बोला… ना या अंजली-पवनच्या आवाजाने लक्ष्मणरावांची विचार तंद्री भंग झाली… हो… अरे पवन, अंजली अगदी बरोबर बोलते आहे. रक्षाबंधन या पवित्र सणांची महती आजच्यादृष्टीने सांगायचे तर, हे एक रक्षासूत्र आहे, जे बांधते बहीण भावाच्या हातावर. परंतु मदतरुपी रक्षेच वचन दोघे एकमेकांना देतात… कारण हे नातच बहीण-भावाचं आहे… त्यांच्या प्रेमाचं आहे… यात कोणी कोणासाठी काय करायचं याचा ठराविक नियम नाही… स्त्री-पुरुष हा भेद नाही, कमजोर बलवान ही बंधने नाहीत. फक्त एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन आहे या सुंदर नात्याच्या साजरेपणात… पुराणातील कथेत, परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटाला जेव्हा रक्ताची धार लागली होती, तेव्हा देवी द्रौपदीने आपल्या नेसलेल्या जरीकाठ साडीचा पदर फाडून हरीच्या बोटाला बांधले व रक्त थांबविले… तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला तिच्या या केलेल्या सहकार्याचे नक्की चांगले फळ देईन, असे वचन दिले…. जर परमेश्वरसुद्धा या पवित्र नात्याचा अर्थ असा समर्पक व सुंदर लावतो व मानतो तर आपण कोण यात एकांगी सणांचा अर्थ लावणारे…
तर मुलांनो, रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्याची वीण घट्ट करणारा उत्सव आहे…. परस्परातील प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे… त्याला अमुक एका चौकटीत अडकवून ठेवणारे बंधन नाही…
लक्ष्मणरावांनी मुलांकडे एक नजर टाकली, तर पवन आपल्या विचारात, अंजलीने दाखविलेल्या नवीन दृष्टीने रक्षाबंधन सणांची महती न्याहाळत होता व अंजली आपल्या नवीन दृष्टीला आजोबांची साथ मिळाली या समाधानात होती.
– प्रीती चिंडक