समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी : तहसीलदारांमार्फत राज्यपालांना पाठविले निवेदन
प्रतिनिधी /निपाणी
अठरापगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलशाहीपासून संपूर्ण भारताची सुटका केली. अशावेळी शिवरायांनी रक्ताने लिहिलेला हिंदवी स्वराज्याचा इतिहास मूठभर शाईने कदापि पुसला जाणार नाही, असा संदेश देत निपाणीत हजारो शिवप्रेमी एकवटले. बेंगळूर येथील छत्रपती शिवरायांच्या व बेळगाव येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळय़ांच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ निपाणीत शिवप्रेमींनी मूक मोर्चा काढला. अत्यंत शिस्तबद्ध, संयम तसेच शांततेत निघालेल्या या मोर्चाने पुन्हा एकदा शिवप्रेमींची ताकद दाखवून दिली.
मुकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 10 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी जमू लागले. यावेळी युवतींच्या हस्ते शिवपुतळय़ास दुग्धाभिषेक, जलाभिषेक करत पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याचवेळी क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा विजय असोच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सकाळी 11.15 च्या सुमारास मूकमोर्चास सुरुवात झाली.
मूकमोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून चाटेमार्केट, जुना मोटारस्टँड, नगरपालिकामार्गे जुना पी. बी. रोडवरून तहसीलदार कार्यालयात आला. यावेळी येथे युवतींच्या हस्ते राज्यपालांच्या नावे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळय़ांच्या विटंबनेला कारणीभूत असलेल्या समाजकंटकांवर कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी, कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देऊन सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवप्रेमी माघारी परतले.
ग्रामीण भागातून शिवप्रेमींची गर्दी
पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ निपाणी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी काही गावांमध्ये मूकमोर्चे निघाले. यानंतर तेथील शिवप्रेमींनी निपाणीत येऊन येथील मूकमोर्चात हजेरी लावली. यावेळी शिवरायांच्या वेशभूषेतील बालकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. मोर्चाच्या अग्रभागी भगवा झेंडा हातात घेतलेल्या युवती होत्या.
संयमाचा अंत पाहू नका…
सोमवारी शिवप्रेमींनी शिवपूजन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर मात्र मूकमोर्चा सुरू झाल्यानंतर कोणत्याही घोषणा न देता अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा पार पडला. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताणही कमी झाला. असे असले तरी प्रशासनाने या संयमाचा अंत पाहू नये, दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी, असा इशाराही उपस्थित शिवप्रेमींनी दिला.