आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल
नवी दिल्ली :
निमलष्करी दलाने आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात सुरक्षा दलांनी 1 हजार विदेशी उत्पादनांच्या वापराला स्थगिती दिली आहे. केंद्रीय पोलीस कल्याण भांडाराच्या सीएसडी कँटीनमध्येही आता विदेशी सामग्रीची विक्री होणार नाही. मायक्रोवेव्ह, पादत्राणे, कपडे, टूथपेस्ट यासह 1 हजार विदेशी उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला होता. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने स्वतःच्या अखत्यारित येणारे विभाग आणि सशस्त्र दलांमध्ये स्वदेशी उत्पादनांना चालना देण्याचा निर्णय घेतला होता.
10 लाख जवान, 50 लाख कुटुंबीय
निमलष्करी दलात सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी, आसाम रायफल्सचे 10 लाखांपेक्षा अधिक जवान आहेत. या सर्वांचे कुटुंबीय जोडल्यास 50 लाखांपेक्षा अधिक जण सेंट्रल पोलीस कँटीनमधून खरेदी करतात. आता हे लोक स्वदेशी उत्पादनांची खरेदी करणार आहेत.
‘या’ उत्पादनांवर बंदी
पादत्राणे, स्केचर, रेड बुल ड्रिंक, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, कपडे, टूथपेस्ट, हावेल्सची उत्पादने, हॉर्लिक्स, शाम्पू, बॅगेसह अनेक विदेशी उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. या उत्पादनांऐवजी आता केवळ स्वदेशी सामग्रीचा वापर केला जाणार आहे. विदेशी उत्पादनांवर पूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन जवानांना करण्यात आले आहे.