केवळ वकिलांनाच न्यायालयात प्रवेश : न्यायालयात काम करण्याबाबत उच्च न्यायालयाकडून बऱयाच मर्यादा
प्रतिनिधी /बेळगाव
उच्च न्यायालयाने सोमवारपासून न्यायालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार सोमवारी न्यायालये सुरू झाली. मात्र न्यायालयामध्ये केवळ वकिलांनाच प्रवेश देण्यात येत असल्यामुळे पक्षकारांना न्यायालयासमोरच ताटकळत दिवसभर थांबावे लागले. दररोज 30 खटल्यांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे वकिलांनीही सकाळपासूनच आपल्या खटल्याचे कामकाज चालविण्याचे प्रयत्न केले आहेत.
न्यायालयामध्ये काम करण्याबाबत उच्च न्यायालयाने बऱयाच मर्यादा घातल्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 15 तर दुपारच्या सत्रामध्ये 15 खटल्यांचे कामकाज करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 15 आणि दुपारी 15 असे एकूण 30 खटल्यांचे कामकाज पार पाडले आहे. साक्ष नोंदविणे, वकिलांचा युक्तिवाद तसेच खटल्याचा अंतिम निकाल देण्याबाबत प्रधान्य द्यावे, असे उच्च न्यायालयाने बजाविले आहे.
उच्च न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कारागृहातून संशयित आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपला जबाब नोंदवू शकतो. याचबरोबर साक्षीदारही व्हिडिओच्या माध्यमातून आपला जबाब नेंदवू शकतो. काही वकिलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून हे कामकाज सोमवारी केले आहे. न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांची कार्यालये खुली करण्यास अजून मनाई आहे. याचबरोबर कँटिनला परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ न्यायालयीन कामकाज वेळेत करणे, कोरोनाच्या नियमांचे पालन करत हे कामकाज करायचे आहे. त्यानुसार सोमवारी न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली आहे.