पंढरपूर पुन्हा एकदा भक्तीरसात भरू दे, अन् महाराष्ट्राला आरोग्यसंपन्नता लाभू दे- मुख्यमंत्र्यांचे साकडे
पंढरपूर / संकेत कुलकर्णी
एकादशीला सकाळच्या वेळात झालेला टाळ-मृदुंगाचा गजर. अन संपूर्ण दिवसभर चंद्रभागेच्या तिरावर निरव शांतता. अशा परिस्थितीत पंढरपूर शहरात आषाढी एकादशीचा सोहळा रंगला गेला. एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पंढरपूर भक्तीरसात पुन्हा भरू दे, पायी वारी होऊ दे अन् राज्याला आरोग्यसंपन्नता लाभू दे’ असे विठुमाऊली चरणी साकडे घातले आहे.
विठोबाच्या आषाढी एकादशीचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केलेल्या शासकीय महापूजेने झाला. याप्रसंगी मानाचे वारकरी म्हणून केशव व इंदूबाई कोलते दांपत्य उपस्थित होते. तत्पूर्वी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी नित्यपूजा केली. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
यानंतर सकाळी सात वाजल्यापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत निळोबाराय अशा सर्वच मानांच्या संताच्या पादुका नगर प्रदक्षिणेसाठी निघाल्या. प्रसंगी शहरातील महाराज मंडळी आणि नागरीकही प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले होते. संचारबंदी असली. तरी स्थानिकांना नगर प्रदक्षिणेसाठी अप्रत्यक्षरित्या शिथिलता देण्यात आली होती. परिणामी परगावचे देखील अनेक विठ्ठलभक्त छुप्या मार्गाने पंढरीत दाखल झाले.
दरम्यान, नगर प्रदक्षिणेवेळेसच चंद्रभागेचे स्नान देखील पादुकांना घालण्यात आले. तर अकरा वाजता खासगीवाल्यांचा राहीरखुमाईसह पांडुरंगाचा असणारा रथोत्सव प्रतिकात्मक पध्दतीने ट्रक्टरमधून निघाला गेला. अन एकादशीचे धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाले. एकादशीचा सोहळा असला तरी संपूर्ण चंद्रभागेचे वाळवंट हे रिकामे होते. तर मंदिर परिसरामध्ये पोलिसांची आणि शासकीय अधिकाऱयांचीच नामदेव पायरीच्या दर्शनासाठी गर्दी होती. कोरोनाच्या सावटामुळे महापूजेनंतर एकाही व्यक्तीला मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला नाही.