हलगा-मच्छे बायपासविरोधात पाठविले होते पत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱयांची सुपीक जमीन गेल्यामुळे अनेक शेतकरी तणावाखाली आहेत. काही जणांचा यामुळे मृत्यू झाला तर काही जण मानसिक तणावाखाली जगत आहेत. एका शेतकऱयाच्या आई-वडिलांनी तर तणाव घेतल्यामुळे आईला अर्धांगवायुचा झटका आला तर त्याचे वडील दररोज दुसऱयाच्या शेतामध्ये काम करत आहेत. त्यामुळे सुरेश नागेंद्र मऱयाकाचे या शेतकऱयाने पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आपली परिस्थिती काय झाली हे कळविले होते. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून लवकरच याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सुरेश मऱयाकाचे या शेतकऱयाची हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये असलेली थोडी जमीन गेली. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी अधिक तणाव घेतला. आमचे पुढे कसे होणार? अशा काळजीमध्ये ते होते. या तणावामुळे आईला अर्धांगवायुचा झटका आला तर वडीलांना दररोज दुसऱयाच्या शेतात काम करण्यासाठी जावे लागत आहे. तेही तणावाखालीच आहेत. सुरेश हा शेती गेल्यामुळे लहान-मोठी मिळतील ती कामे करू लागला आहे.
घरची ही परिस्थिती पाहून सुरेश याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले. यापूर्वीही त्याने चार पत्रे पाठविली होती. मात्र, त्याची दखल घेतली नव्हती. आता दखल घेण्यात आली असून बागेवाडीच्या सर्कलने त्यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून आम्हाला तुमच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी निवडणुकीनंतर प्रत्यक्ष तेथे येऊन पाहणी करू, असे सर्कलनी आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्यामुळे आता पुढे काय होणार? ही उत्सुकता लागून राहिली आहे. रस्ता कायमचा बंद झाला तर निश्चितच त्याचे आम्ही स्वागत करू. हा एकच शेतकरी नाही तर असे अनेक शेतकरी तणावाखाली आहेत. तेव्हा पंतप्रधानांनीच याकडे लक्ष देऊन हा रस्ता कायमस्वरुपी रद्द करावा, अशी मागणी होत आहे. शेतकऱयांनी एकजुटीने लढा देऊन उच्च न्यायालयात धाव घेऊन या रस्त्याला स्थगिती मिळविली आहे. यासाठी कर्जदेखील काढले आहे. तेव्हा याचा जिल्हा प्रशासनानेही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.