ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने 24 मार्चला 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली होती. उद्या याचा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दहा वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशवासीयांची संवाद साधणार आहेत. यावेळी पूर्ण देशात लॉक डाऊन चा कालावधी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, लॉक डाऊन च्या 21 दिवसांच्या काळात मोदींनी देशाला दोन वेळा संबोधित केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एक दिवसाचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर घरातील लाईट बंद करून दिवा लावण्यास सांगितले होते.
सर्व देश लॉक डाऊन करून देखील देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता संपूर्ण देशात हा लॉक डाऊन चा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उद्या पंतप्रधान मोदी काय घोषणा करतील याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच पंतप्रधान मोदी एक मे पासून आर्थिक आणीबाणी जाहीर करतील अशी चर्चा आहे.