पर्यावरण हानी आणि कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली
पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी देशातील कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पिकांच्या 35 नमुन्यांचे अनावरण केले आहे. ही पिके पर्यावरणस्नेही असून त्यांच्यात पोषक द्रव्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ती पर्यावरण संरक्षण आणि कुपोषणावर मात अशा दोन्ही उद्देशांसाठी अनुकूल आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधानांनी या पिकांची बियाणे व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून एका कार्यक्रमात राष्ट्राला अर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजन आयसीएआर संस्थाच्या वतीने करण्यात आले होते. या संस्था केंद्र आणि राज्य सरकारांच्या कृषी विद्यापीठांच्या आहेत. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राने सह प्रायोजित केला होता.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हरित परिसर पुरस्कारांचेही वितरण केले. यंदा हे पुरस्कार चार कृषी विद्यापीठांना देण्यात आले आहे. त्यांनी प्रयोगशील शेतकऱयांबरोबरही संवाद साधला. या शेतकऱयांनी पीक वाढीसाठी अनोखे आणि कल्पक मार्ग अवलंबिले आहेत. त्यांनी याच कार्यक्रमांतर्गत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटिक स्ट्रेस टॉलरन्स (एनाआयबीएसटी) या संस्थेच्या नवनिर्मित परिसराचे उद्घाटनही केले. ही संस्था रायपूर येथे कार्यरत आहे.
1300 बियाणी विकसित
पर्यावरणपूरक आणि कुपोषण निवारक अशा 1300 धान्य बियाणांचा विकास देशातील कृषी प्रयोग शाळांमध्ये करण्यात आला आहे. यापैकी 35 बियाणे आज देशातील शेतकऱयांनी अर्पित करण्यात येत आहे. अननुकुल हवामानातही तगून राहण्याची या बियाण्यांची क्षमता आहे. तसेच त्यांच्या लागवडीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्यास आणि प्रदुषण कमी होण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱयांनी या बियाणांचा स्वीकार करून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावावा. तसेच स्वतःचाही लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
6, 7 वर्षातील प्रगती
गेल्या सहा सात वर्षात सरकारने कृषी क्षेत्रात विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले आहे. कृषी क्षेत्राच्या समस्यावर आधुनिक तंत्रज्ञान हा सर्वात प्रभावी उपाय आहे. नव्या प्रकारचे बियाणे विकसित करण्यावर भर देण्यात येत असून या बियाणांपासून निर्माण होणारी पिके पोषक द्रव्यांच्या दृष्टीने पारंपरिक पिकांपेक्षा अधिक समृद्ध असतील याकडे संशोधनात लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे या अल्पकालावधीत अनेक नवी बियाणे शोधून काढण्यात आली असून त्यामुळे पिकांच्या उत्पादनातही वाढ शक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अशी आहेत नवी बियाणे
मंगळवारी देशाला अर्पण करण्यात आलेल्या 35 नव्या बियाणांमध्ये अधिक सहनशक्ती असलेल्या चिकपिया, विल्ट आणि कीड संसर्गाला प्रतिकार करू शकणाऱया पिजनपिया, पोषक द्रव्यानी अधिक समृद्ध असणाऱया सोयाबीन बिया, कीड प्रतिबंधक भात, आणि जैवसुरक्षित गव्हाची बियाणे तसेच जोंधळे, मका, बिन्स इत्यादी बियाणांचा समावेश आहे. ही आधुनिक बियाणे आहेत.
मार्केटिंगचीही व्यवस्था होणार
केवळ बियाणे संशोधनावर भर देण्यात येत नसून कृषी मालाच्या मार्केटिंगची सुविधाही अत्याधुनिक पद्धतीने परिवर्तीत करण्यात येत आहे. शेतकऱयांना त्यांची उत्पादने कोणत्याही बाजारपेठेत विकण्याची सवलत देण्यात आलेली आहे. ातसेच मोबाईल ऍपच्या माध्य़मातून कृषी बाजारपेठांची उपलब्धता समजण्याची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पंतप्रधान मोदींनी याप्रसंगी दिली.
नवी बियाणी नव्या अशा
1. 35 नव्या सुदृढ बियाणांचे शेतकऱयांसाठी अर्पण
2. बियाणांबरोबरच मासे संशोधनावरही सरकारचा भर
3. पर्यावरण संरक्षण आणि कुपोषण मुक्तीवर देणार भर