वार्ताहर/ भुईंज
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर किसनवीरच्या कामगारांनी तब्बल थकलेले 22 महिन्यांचे पगार व इतर मागण्यासाठी कारखान्याच्या गेटवरच आंदोलन केले. दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करताना कर्मचाऱयांनी किसनवीर व्यवस्थापनावर व त्यांच्या वेळोवेळीच्या आश्वासनाला आम्ही मात्र बळी पडलो असून आज आमचे संसार उघडय़ावर पडल्याची संतप्त भावना सुद्धा यावेळी अनेक कर्मचाऱयांनी व्यक्त केल्या.
सातारा जिह्यातील पाच तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या किसनवीर सातारा साखर कारखान्याचा गेले अनेक वर्ष महाराष्ट्रभर नावलौकिक होता. मात्र त्यावर कोटय़ावधी रूपयांचे कर्ज असल्याने यावर्षी हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. यामुळे वाई, सातारा, कोरेगाव, जावली, खंडाळा हे कार्यक्षेत्र असऱया तालुक्यातील शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कारखान्याच्या कर्मचाऱयांचे गेले 22 महिने पगारच झाले नसल्याने या सर्व कामगारांनी कारखान्याच्या गेटवरच आपल्या मागण्यासाठी आंदोलन केले. यामध्ये सुमारे 400 ते 500 कामगार सहभागी झाले होते.
किसनवीर कारखाना कामगारांनी दिलेल्या आपल्या निवेदनात कामगारांचे थकीत असलेले सर्व पगार त्वरित देण्यात यावेत, कामगारांचे थकीत असलेले पीएफ ग्रॉच्युटी व एलआयसी त्वरित भरावीत, कामगारांना एप्रिल 2014 पासून लागू झालेली 15 टक्के पगार वाढ व फरक रक्कम त्वरित देण्यात यावी, थकीत असलेले सर्व बोनस देण्यात यावेत. हंगामी सेवकांचे थकीत रिटेंशन व रजेचा पगार मिळावा. कामगारांना 2019 पासून लागू झालेली 12 टक्के पगारवाढ व फरक रक्कम देण्यात यावी. व्यवस्थापनाने ठरवलेल्या पॉटर्ननुसार टेम्पररी असलेल्या कर्मचाऱयांना हंगामी करावे. राहिलेल्या 83 लोकांचे गेडेशन करावे. कामगारांच्या पगारातून कपात झालेली दोन्ही सोसायटय़ांची रक्कम दोन्हीही सोसायटय़ांना जमा करावी, या सर्व मागण्यासाठी किसनवीर कारखान्याच्या गेटवर कामगारांनी आंदोलन केले.
जगावे की मरावे…
अनेक कामगार मनोगत व्यक्त करत म्हणाले, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापनाला व त्यांच्या आश्वासनाला आता कामगार कंटाळलेला आहे. गेले दोन वर्षापासून पगार नसल्याने कारखान्याचा कर्मचारी हा कुटुंबासह रस्त्यावर आला असून त्याचे घर चालणेसुद्धा मुश्कील झाले आहे. त्यामुळे आम्ही जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.