मे अखेरपर्यंत 3.20 लाख निरक्षरांना साक्षर बनविण्याचे उद्दिष्ट : शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकार प्रायोजित वाचन-लेखन (पढना-लिखना) अभियानाला राज्यात 2 एप्रिल रोजी चालना देण्यात येणार असून मे 2021 पूर्वी 3.20 लाख निरक्षरांना साक्षर बनविण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
बेंगळूरमध्ये सोमवारी लोकशिक्षण संचालनालयाच्या प्रगती आढावा बैठकीप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विजापूर, रायचूर, गुलबर्गा, यादगिर, चामराजनगर या जिल्हय़ांमधील 24 तालुक्यांमधील 219 ग्राम पंचायत आणि 19 शहरी भागात वाचन-लेखन अभियान राबविण्यात येणार आहे. 15 ते 50 वर्षाखालील 2.4 लाख महिला आणि 80 हजार पुरुषांना साक्षर बनविण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. अध्यापन पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची परीक्षा घेण्यात येईल. त्यात ते उत्तीर्ण झाले तर त्यांना शिक्षण खात्याकडून साक्षरता प्रमाणपत्र देण्यात येईल.
राज्यात 1.26 कोटी निरक्षरांपैकी 57 लाख जणांना साक्षर बनविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय धोरणाच्या आशयाप्रमाणे साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य सरकार विविध कार्यक्रमांची आखणी करत आहे. नवसाक्षरांना कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
अलिकडेच ग्राम पंचायतींवर निवडून आलेल्या निरक्षरांना लोकशिक्षण संचालनालयाकडून ग्रामविकास व पंचायतराज खात्याच्या सहकार्याने निरंतर साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी अधिकाऱयांना दिली. याबाबत संबंधित खाते प्रमुखांशी चर्चा करून कृती आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
ग्रंथालयांमध्ये नवसाक्षरांना स्वतंत्र आसनव्यवस्था
ग्रामविकास-पंचायतराज खात्यातर्फे चालविण्यात येणाऱया ग्रंथालयांमध्ये नवसाक्षरांना स्वतंत्र आसनव्यवस्था व पुस्तकांचे कपाट उपलब्ध करून दिले जावे. गार्मेंट कंपन्यांमधील कर्मचारी, सिद्धी समाजातील निरंक्षणांना देखील साक्षरतेच्या प्रवाहात आणण्याचे काम झाले पाहिजे. गरीबी व इतर कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शिकण्याची पुन्हा संधी मिळत असल्याची भावना निर्माण करण्यासाठी लोकशिक्षण संचालनालयाने प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.