प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या पाठोपाठ आता 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पदवीपूर्व प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश पदवीपूर्व शिक्षण खात्याने दिला आहे. त्यानुसार मंगळवारपासूनच पदवीपूर्वच्या पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अतिरिक्त शुल्काविना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालकांनी मंगळवारी प्रवेश प्रक्रियेसंबंधीचा आदेश जारी केला आहे. 2021-22 या वर्षातील पदवीपूर्व प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया दहावी परीक्षेच्या निकालानंतर दुसऱया दिवसापासूनच सुरू करण्याची सूचना देण्यात आली होती. सोमवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे.
मंगळवारपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कोणत्याही दंडाशिवाय प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. तर 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत विलंबाने प्रवेशाकरिता 670 रुपये दंड स्वरुपात जमा करून प्रवेश घेता येणार आहे. याशिवाय विशेष दंड स्वरुपात 2,890 रुपये जमा करून प्रवेश घेण्यासाठी 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ही मुदत असणार आहे.