रामपूर येथील सुवर्णभास्कर महानोकरी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला लाभणार उपस्थिती
प्रतिनिधी/ चिपळूण
बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 13 फेब्ा्रgवारी रोजी सकाळी 10 वाजता रामपूर येथील मिलिंद हायस्कूलच्या मैदानावर सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पर्यावरणमंत्री व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
तसेच आगामी निवडणुकांसाठी आपण नजीकच्या मतदार संघात जोमाने काम करण्याचे संकेत देतानाच गुहागर मतदार संघातील 102 ग्रामपंचायतींवर सेनाप्रणित पॅनलचे वर्चस्व असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बेरोजगार तरूणांना नोकऱया मिळवून देण्यासाठी माझ्या पुढाकाराने जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ऍपॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात सुमारे 50 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्या 7 वीपासपासून अगदी उच्च शिक्षण घेतलेल्या सुमारे 5 हजार तरूणांना नोकऱया देणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते होणार असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहणाऱया सर्वांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा केला जाणार असून सर्व नियम पाळले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदार संघातील 106 ग्रामपंचायतींवर भाजप प्रणित पॅनलची सत्ता येईल अशी घोषणा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षांनी केली होती. मात्र घोषणा करण्यापलिकडे आवश्यक तयारी त्यांनी केली नाही. उलट आम्ही आव्हान न देता काम केले. त्यामुळे 102 ग्रामपंचायतींवर सेनाप्रणित पॅनलची सत्ता आली आहे. हा विजय मी बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत असून हे यश माझे नसून ते कार्यकर्त्यांचे आहे. मात्र आता निवडणुका विसरून सर्वांनी विकासाच्या दिडींत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मी एका मतदार संघापुरता मर्यादित नसून यापूर्वी एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे आताच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चिपळुणातील कुंभार्ली, येगाव आदी गावांतील कार्यकर्त्यांनी माझी मदत मागितली व मी त्यांना ती दिली आणि तेथे त्यांची सत्ताही आली. यापूर्वी अलोरे, पोफळी, सावर्डे येथे माझी सत्ता होती. तेव्हाची जी उर्मी होती तीच उर्मी आजही कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मला नजीकच्या मतदार संघात एन्ट्री करावी लागेल असे सांगून पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती स्वीकारायला मी तयार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, प्रवीण ओक, सुनील पवार, बाबू कलमुंडकर, नीलेश मोरे, सुरज सुर्वे, अमरदीप परचुरे आदी उपस्थित होते.