वार्ताहर/ केपे
आधुनिक गोव्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याकरिता सामाजिक, आर्थिक क्षेत्रात कार्य करत गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्याचे प्रयत्न स्व. मनोहर पर्रीकर यांनी केले. त्यांचे हे स्वप्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केपे येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार क्लाफास डायस, माजी आमदार दामू नाईक, प्रकाश शं. वेळीप, योगेश कुंकळय़ेकर, नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, जि. पं. सदस्य खुशाली जो. वेळीप, सिद्धार्थ गावस देसाई, शाणू वेळीप, संजना वेळीप, केपे उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक दयेश नाईक, चेतन हळदणकर, गणपत मोडक, सरपंच जासिंता डायस, आलुलिया आफान्सो व इतर हजर होते.
‘हम दो हमारे दो’ अशी गत काँग्रेसची झाली असून काँग्रेस सरकारच्या काळात आश्वासने, घोषणाबाजी एवढेच व्हायचे. पुढच्या निवडणुकीत नवीन आश्वासने घेऊन यायचे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली असे सांगायची कुणाला हिंमत होत नसे. जी आश्वासने दिली ती पूर्ण केली असे सांगायचे धाडस फक्त भाजप सरकारमध्ये आहे, असे नड्डा म्हणाले. गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर विकासाला गती दिली असून गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. जुवारीवरील नवीन पुलाचे काम मागील 30 वर्षांत सुरूच होत नव्हते. गेल्या तीन वर्षांत या कामाला गती मिळाली आहे. 16 हजार लिटर पाणी मोफत अशा अनेक योजना राज्य सरकारने राबवल्या आहेत. बाकीचे पक्ष येतात आणि आश्वासने देऊन जातात, आणखी काही करत नाहीत, असे ते पुढे म्हणाले.
सत्ता नव्हे, जनसेवा हे उद्दिष्ट
कोरोनाच्या काळात अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत पुन्हा कोरोनाची लागण वाढत असताना 134 कोटी जनसंख्या असलेल्या आमच्या देशात कोराना महामारीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले असून 100 कोटी लसीकरण झालेले आहे. यावरून कळते की, आज देश पुढ जात असून विकासाच्या दृष्टीने नवे अध्याय लिहिले जातील. हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे नड्डा यांनी पुढे सांगितले. गरीब घटकांना सुविधा देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. गोव्यात गुन्हेगारी कमी आहे. पर्यटक संख्या सुद्धा आता वाढली आहे. विरोधी पक्ष विकासाच्या संदर्भात आमचा मुकाबला करू शकत नाहीत. आमचे उद्दिष्ट सत्ता नसून जनतेची सेवा करणे हे आहे, असे नड्डा यांनी सागितले.
2014 नंतर गोव्याचा खरा विकास ः सावंत
लोकांना सेवा देत असताना सत्याची कास धरून सातत्याने विकास केला. म्हणून येणारी पाच वर्षे पुन्हा समृद्धीची असतील असा विश्वास आहे. 2014 नंतर खऱया अर्थाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गोव्याचा विकास झाला. रस्ते, पर्यटन सुविधा अशा विविध योजनांच्या माध्यमातून 20 हजार कोटींची कामे गोव्यात सुरू आहेत. मोदींच्या हस्ते 5 नव्या प्रकल्पांचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोव्याचे कृषी खाते उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले कार्य करत आहे. 2022 मधील निवडणुकीतून पुन्हा एकदा गोव्यात समृद्धी आणणारे भाजपचे सरकार सत्तेवर यायला हवे. हल्लीच्या दिवसांत एक विचित्र पद्धतीचे राजकारण सुरू आहे. गोवा हा शांत प्रदेश असून सदैव एकसंध राहिला आहे. ते बिघडू देऊ नका. पश्चिम बंगालात निवडणुकीनंतर जे घडले ते सर्वांनी पाहिलेले आहे. जे तिथे जनतेचे रक्षण करू शकले नाहीत ते येथे काय करतील. जे दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणात आणू शकले नाहीत ते येथे येऊन काय करतील, असे सवाल सावंत यांनी केले.
काँग्रेसची गत बिकट ः तानावडे
काँग्रेसची सायकल चालवण्याकरिताही माणूस नाही अशी गत झाली आहे. या मतदारसंघात ज्याला काँग्रेसने उमेदवार म्हणून जाहीर केले आहे त्याला अनुभव नाही. तो पंचायत निवडणूक जिंकलेला नाही, त्याने पालिका निवडणूकही लढवलेली नाही तसेच तो जिल्हा पंचायत सदस्यही झालेला नाही, असे तानावडे म्हणाले. भाजपात प्रवेश केल्यानंतर लोक आपल्याबरोबर असणार याची खात्री होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर आपल्या व भाजपच्या अशा दुप्पट कार्यकर्त्यांची साथ लाभली आहे. भाजप सरकार एकसंधपणे कार्य करत आहे, असे कवळेकर यांनी सांगितले.
केपे पालिका चौकात आयोजित केलेल्या या सभेला केपे मतदारसंघातून मोठय़ा प्रमाणात लोक हजर होते. ही सभा केपे बाजार क्षेत्रात मुख्य रस्त्याजवळ असल्याने व मोठा प्रतिसाद लाभल्याने मडगाव ते कुडचडे रस्त्यावरची वाहतूक दुसऱया मार्गाने वळविण्यात आली. सभेत प्रत्येक नेत्याचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले. पालिकेतील कवळेकर समर्थक नगरसेवक अमोल काणेकर व फिलू डिकॉस्ता वगळता इतर सर्व नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप फळदेसाई, खुशाली वेळीप, विजयकुमार कोप्रे यांनी केले.