चार जिल्हय़ांमधील 43 मतदारसंघांमध्ये मतदान
@ कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये आज गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. कोरोनाच्या उद्रेकाची स्थिती पाहता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुरक्षेची व्यवस्था केली आहे. या टप्प्यात उत्तर चोवीस परगाणा, नादिया, उत्तर दिनाजपूर आणि पूर्व बर्धमान या जिल्हय़ांमध्ये हे मतदारसंघ आहेत.
या टप्प्यात 1 कोटी 3 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा अधिकार उपयोगात आणणार असून एकंदर 14 हजार 480 मतदानकेंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी आणि मतदान निर्भयपणे करता यावे, यासाठी केंद्रीय अर्धसैनिक दलांच्या आणि केंद्रीय राखीव पोलीस दलांच्या किमान 1 हजार 71 तुकडय़ा नियुक्त करण्यात आल्या आहेत. कोरोनासाठीच्या नियमांचे कठोरपणे पालन प्रत्येक मतदान केंद्रात व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मतुआ समाज महत्वाचा
या टप्प्यातील अनेक मतदारसंघांमध्ये मतुआ या दलित समाजाच्या मतदारांची महत्वाची भूमिका राहणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँगेस या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षांनी या समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा समाज स्वातंत्र्यानंतर सध्याच्या बांगला देशातून भारतात आला आहे. सत्तेवर आल्यास राज्यात नागरीकत्व सुधारणा कायदा लागू करून या समाजाला भारताचे स्थायी नागरीकत्व दिले जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला असल्याने या निवडणुकीतही भाजपच्या त्याच्याकडून अपेक्षा आहेत.
ज्येष्ठ नेत्यांचा प्रचार
या टप्प्यासाठीच्या प्रचारात भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी भाग घेतला. तर तृणमूलसाठी ममता बॅनर्जी यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जीही प्रचारात होते.
114 मतदारसंघ बाकी
आतापर्यंत या राज्यात मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून एकंदर 180 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया समाप्त झाली आहे. या सहाव्या टप्प्यासह आणखी दोन टप्प्यांमध्ये उरलेल्या 114 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. शेवटच्या दोन टप्प्यांचे मतदान अनुक्रमे 26 एप्रिल आणि 29 एप्रिलला होणार आहे. या राज्यासह, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही तीन राज्ये व पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या दोन व विधानसभांच्या काही पोटनिवडणुका यांची मतमोजणी 2 मे या एकाच दिवशी होणार आहे. तत्पूर्वी 29 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध होणार असून त्यामधून अंतिम परिणामांचे अनुमान काही अंशी काढता येणार आहे. तथापि, 2 मे ची उत्सुकता खऱया अर्थाने सर्वांना आहे.