एअर इंडियाच्या कर्मचाऱयांकडून निधीसंकलनाचे कार्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
69 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचा भार असलेली सरकारी विमानोड्डाण कंपनी एअर इंडियाला दिलासा मिळण्याची अपेक्षा बळावली आहे. वरिष्ठ कर्मचाऱयांचा एक समूह स्वतःच्याच कंपनीला खरेदी करण्यासाठी पुढे सरसावला आहे. हे कर्मचारी खासगी कंपनीसोबत शासकीय लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची तयारी करत आहेत. याप्रकरणी त्यांना यश मिळाल्यास देशाच्या कॉर्पोरेट इतिहासात एखाद्या सरकारी कंपनीला त्याच्याच कर्मचाऱयांनी खरेदी करण्याची ही पहिलीच घटना ठरणार आहे.
खासगी कंपनीने कर्मचाऱयांच्या प्रस्तावावर तयारी दर्शविली आहे. या मोहिमेत 200 हून अधिक कर्मचारी जोडले गेले आहेत. सर्वजण प्रत्येक 1 लाख रुपये जमवत आहेत. एअर इंडियात एकूण 14 हजार कर्मचारी आहेत. कंपनीत आजही क्षमता आहे, सर्वकाही सुरळीत राहिल्यास दोन वर्षात कंपनी रुळावर येणार असल्याचा दावा या मोहिमेत सामील एका अधिकाऱयाने केला आहे.
51 टक्के हिस्सेदारी राहणार
लिलावाची पूर्ण प्रक्रिया वाणिज्यिक संचालिका मीनाक्षी मलिक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. पात्र बोलीदारांविषयी 28 डिसेंबरपर्यंत माहिती समजणार आहे. योजना यशस्वी राहिल्यास कर्मचाऱयांकडे एअरलाइनची 51 टक्के हिस्सेदारी राहणार आहे. तर गुंतवणुकदाराकडे 49 टक्के हिस्सा असणार आहे.