पंजाबमध्ये शेतकरी संघटनांचे घोषणापत्र ः राष्ट्रीय महामार्ग करणार टोलमुक्त
पंजाबमध्sय निवडणूक लढवत असलेल्या 22 शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चाने ‘चुनाव इकरारनामा’ या नावाने 25 सूत्री घोषणापत्र सादर केले आहे. चंदीगडमध्ये मोर्चा प्रमुख बलवीर राजेवाल यांनी शेतकऱयांना फळ-भाज्यांसमवेत प्रत्येक पिकावर हमीभाव मिळणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर पंजाबमध्ये सर्व राष्ट्रीय महामार्ग टोलमुक्त केले जातील. हुसैनीवाला आणि वाघा सीमा खुली करत पाकिस्तान आणि मध्य आशियासोबत व्यापार करू असा दावाही त्यांनी केला आहे.
पंजाबमध्ये कॉर्पोरेट्सना चालना देणार नाही. छोटय़ा उद्योगांद्वारे पंजाबचा विकास घडवू आणि यातून रोजगारही मिळणार आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला प्राधान्य ले जाईल. पंजाब सीमावर्ती राज्य असल्याने केंद्राकडून विशेष राज्याचा दर्जा मागितला जाईल. केंद्राने विशेष पॅकेज द्यावे, तसेच युएपीए सारखे गुन्हे मागे घेतले जाणार असल्याचे राजेवाल म्हणाले.
चुनाव इकरारनामा
-शेती बचा आयोग, 25 हजार उत्पन्न निश्चित करण्यासाठी धोरण
-पिकाचे नुकसान झाल्यास सहकारी सोसायटीद्वारे भरपाई
-अन्नप्रक्रियेसाठी शेतकऱयांना 2 टक्के व्याजावर 5 लाखांपर्यंतचे कर्ज
-छोटय़ा उद्योगांना प्राधान्य, सहकारी संस्थांना मजबूत करणार
-सहकारी संस्थांचे कर्ज वेळेत परत करणाऱयांना व्याजमुक्त कर्ज
-महसूल विभागाच्या सेवा शेतकऱयांना निश्चित वेळेत देणार
-शिक्षण-आरोग्य क्षेत्र मजबूत करणार
माफिया संपविणार, वीज स्वस्त
पंजाबमध्ये मद्य, वाळू आणि वाहतूक माफिया संपविले जातील. सहकारी संस्था आणि महामंडळ स्थापन करून सरकार सर्व कामे स्वतःच्या हातात घेईल. याचबरोबर महागडय़ा विजेचे करार रद्द होतील. राज्य ऊर्जा नियामक आयोगाला मजबूत करू आणि थेट ग्रीडकडून खरेदी करून स्वस्त वीज देणार असल्याचे राजेवाल यांनी सांगितले आहे.
90 दिवस काम करणार विधानसभा
सत्तेवर आल्यास पंजाब विधानसभा वर्षात 90 दिवस काम करणार आहे. यात 75 टक्के आमदारांना हजेरी अनिवार्य असेल. याचबरोबर एक लेखापरीक्षण आयोग स्थापन करून नेते आणि अधिकाऱयांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करविली जाईल असे मोर्चाकडून म्हटले गेले.