लाड कमिटीनुसार पाच जणांच्या वारसांना पालिकेत नोकरी
प्रतिनिधी / कराड
येथील नगरपालिकेत 1984 साली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱयाच्या वारसाला सुमारे 36 वर्षांनी न्याय मिळाला. उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी याकामी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे पाठपुरावा केल्याने त्याच्या वारसास पालिकेच्या आरोग्य विभागात कायमस्वरूपी आस्थापनेवर नोकरी मिळाली आहे. एकुण पाच सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या वारसांना नोकरी मिळाली आहे.
रेवण गोविंद भिसे हे नोव्हेंबर 1984 साली पालिकेतून सेवानिवृत्त झाले होते. केरू खरात हे जुलै 1987 रोजी निवृत्त झाले होते. नामा काटरे जून 1991 रोजी तर सुमन चव्हाण हे जुलै 1996 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. तर श्यामू कांबळे ऑगस्ट 1994 मध्ये पालिका सेवेतून निवृत्त झाले होते. या कर्मचाऱयांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर पालिकेत नोकरी मिळत होती. मात्र निवृत्तीनंतर 5 वर्षांच्या कालावधीत त्यांच्याकडून याबाबत वारसाच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दाखल झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना नोकरी मिळाली नाही. दरम्यानच्या काळात त्यांची मुलेही मोठी झाली. त्यामुळे नातवांच्या नोकरीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
हे कर्मचारी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या प्रभागातील आहेत. पाटील यांनी त्यांना सदरचा प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. पाटील यांनी याबाबत राज्य सरकारच्या मदतीने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे पाठपुरावा केला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या पाचपैकी चार जणांच्या नातवांना तर एकाच्या दत्तक पुत्रास आरोग्य विभागात कायमस्वरूपी आस्थापनेवर नोकरी मिळाली आहे. सुमारे 36 वर्षांनंतर हा प्रश्न मार्गी लावल्याने संबंधित कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी उपनगराध्यक्ष पाटील आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे आभार मानले आहेत. उपनगराध्यक्ष पाटील यांनी, आणखी प्रलंबित असणारे काही प्रस्ताव मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे.