प्रतिनिधी / सातारा :
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे अशी कविता बालकविंनी लिहिलेली आहे. याच कवितेचा प्रत्यय सातारा पालिकेने लावलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून झाडांच्या बाबतीत झाला आहे. पालिकेने लावलेल्या झाडांकडे पुन्हा पहायला कोण गेले असेल असे वाटत नाही. वेलींच्या विळख्यात ही लावलेली झाडे लडबडलेली आहेत. तर संरक्षक कुंपण ही असेतसेच केले आहे. त्यामुळे तीन कोटींचा निधी असातसाच वाया केला. वृक्षारोपणाचे उद्देश सफल होत नसल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाकडून झाडे जगवा झाडे वाचवा या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी वृक्षारोपण शहरात करण्यात येते. शहरात अमृत योजनेच्या माध्यमातून झाडांकरता सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी आला अन् त्यातून ठराविक संस्थेच्याच गळयात हे घोंगडे पालिकेने टाकले. दिलेले काम व्यवस्थित करते आहे का नाही याचीही तसदी पालिकेकडून घेतली जात नाही. लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली?, किती झाडांचे पालनपोषण होत आहे याची माहितीसुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे सातारा पालिकेच्यावतीने वृक्षारोपण केलेले असेतसेच झाले की काय असाही सवाल उपस्थित होवू लागला आहे. शहरातील पारंगे चौक ते पोवई नाका या दरम्यान रस्त्याकडेने झाडे लावली आहेत. या झाडांचे रोपण जीवावर आल्यासारखेच पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.