केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा : भाजपाने गोव्याला दिली स्थीरता व विकास : फोंडय़ात रवी नाईक यांची प्रचारसभा
प्रतिनिधी /फोंडा
राजकीय स्थीरता व धोरणामध्ये सातत्य असते, तेथेच विकास होतो. गोव्यात भाजपाचे सरकार सत्तेवर येताच येथील राजकीय अस्थिरता संपली आणि विकासाला खऱया अर्थाने गती मिळाली. अटल सेतू, जुवारी पूल यासह चौपदरी महामार्ग, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्व प्रकल्प भाजपा सरकारच्या कार्यकाळात उभे राहिले. मागील दहा वर्षे ही विकासाची होती, पुढील पाच वर्षे गोव्याच्या समृद्धीची असतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
माजी मुख्ममंत्री व भाजपाचे फोंडा मतदारसंघातील उमेदवार रवी नाईक यांच्या प्रचारार्थ बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. अमित शहा हे गोवा दौऱयावर आले असून रविवारी त्यांचे गोव्यात आगमन होताच त्यांची पहिली प्रचारसभा फोंडय़ात झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपा उमेदवार रवी नाईक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी हे उपस्थित होते.
पर्रीकरांचे ‘गोल्डन गोवा’चे स्वप्न साकारणार
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासाचा पाया घातला व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यावर कळस चढविला. गेल्या पन्नास वर्षांत गोव्यात जो विकास झाला नाही, तो भाजपाच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात झाला. स्व. मनोहर पर्रीकर यांनी पाहिलेले ‘गोल्डन गोवा’ हे स्वप्न साकारायचे असल्यास पुन्हा गोव्यात भाजपाचेच सरकार सत्तेवर यावे लागेल, असे अमित शहा पुढे म्हणाले.
काँग्रेसने अस्थिरता, अराजक व भ्रष्टाचारच दिला
अमित शहा यांनी काँग्रेससह तृणमूल, आप, मगो व इतर पक्षांवर जोरदार टीका केली. गोव्यात अनेक वर्षे काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी विकासापेक्षा गोव्याला अस्थिरता, अराजक, भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापन दिले. त्यामुळेच विकासाच्या आघाडीवर गोवा मागे राहीला. सन 2013-14 मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारने गोव्याला साधनसुविधांसाठी केवळ रु. 432 कोटी दिले. मात्र मोदी सरकार सत्तेवर येताच रु. 2500 कोटी गोव्याच्या विकासासाठी मंजूर केले. चौपदरी रस्ते, पूल, मोपा विमानतळ याही पुढे जाऊन गोवा शिपयार्डमध्ये केंद्र सरकारने 32 हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. येणाऱया काळात याठिकाणी जागतिक दर्जाचे जहाज बांधणीचे तंत्रज्ञानही विकसित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्यांचे सरकारच नाही येणार, ते आश्वासनेच देणार..!
निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल, आपपासून राष्ट्रवादीपर्यंत अनेक पक्षांनी गोव्यात गर्दी केली आहे. गोव्यात ते सरकार बनवू शकणार नाहीत, त्यामुळेच तोंड फाडून मोठमोठी आश्वासने देत आहेत. गोव्यात काँग्रेस किंवा या पक्षांचे सरकार कधीच बनणार नाही. गोमंतकीय जनता भाजपलाच साथ देणार असा दावाही त्यांनी केला.
गोवा आकाराने छोटा असला तरी केंद्रातील भाजपा सरकारने त्याला नेहमीच भरभरुन दिले आहे. जेथे स्थीरता व धोरणामध्ये सातत्य असते तेथेच गतिमान विकास होतो. केंद्रातील मोदी सरकारच्या स्टार्टअप योजनेला गोव्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाईन शिक्षण व नेट कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी राज्यभरात 144 मोबाईल टॉवर्सना मंजूरी देण्यात आली असून संपूर्ण राज्यात नेटवर्कचे जाळे गुंफले जाणार आहे. गोव्याचा सर्वांगीण विकास, सार्वजनिक सुरक्षा व समृद्धीसाठी भाजपाच्या डबल इंजिनला जोड देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजपा सरकार आश्वासने देत नाही, तर त्याची पुर्तताही करते. आम्ही केवळ बोलत नाही, करुन दाखवतो आणि गेल्या दहा वर्षात जे केले त्याचे प्रगती पुस्तकही जनतेसमोर ठेवले आहे. मते मागण्यासाठी येणाऱया इतर पक्षांकडे त्यांची प्रगती पुस्तके मागा असे आवाहनही शहा यांनी केले.
फोंडय़ासह राज्यात कमळच फुलणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येणाऱया निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रवी नाईक हे निश्चितच विजयी होणार व फोंडय़ात पहिल्यांदाच कमळ फुलणार, गोव्यातही सर्वत्र कमळ फुलणार, असा दावा केला. फोंडय़ाचा विकास हा रवी नाईक यांच्या कार्यकाळातच झाला. बहुजन समाज व कुळ-मुंडकारासाठी त्यांनी केलेले कार्य जनता विसरलेली नाही. त्यांचे योगदान केवळ फोंडय़ासाठीच नसून संपूर्ण गोव्यासाठी आहे. फोंडय़ाचा विकास अधिक गतिमान होण्यासाठी रवी नाईक यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. मगो-तृणमूल युतीवर बोलताना ही युती होण्यापूर्वी गोमंतकीयांनी नाकारली आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचे मगोचे स्वप्न हे दिवास्वप्नच राहणार आहे, अशी टीका त्यांनी केली.
गोवा सावरण्यासाठी भाजपा हाच पर्याय : रवी नाईक
खाण बंदी व त्यानंतर कोरोना महामारीमुळे अडचणीत आलेल्या पर्यटन व्यवसायामुळे गोव्याला सावरण्यासाठी भाजपाचे सरकार हाच एकमेव पर्याय आहे. राज्याचे अर्थकारण रुळावर येणासाठी, महागाई आटोक्यात राहण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आवश्यक आहे. केंद्रातील मोदी सरकारचे पाठबळ मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये गोव्यात पूल, चौपदरी रस्ते व अन्य साधनसुविधा उभ्या राहिल्या त्या केंद्रातील भाजपा सरकारच्या सहकार्यामुळेच. आम्हाला जातीधर्माचे राजकारण नको तर विकास व प्रगतीचे राजकारण हवे आहे असे रवी नाईक म्हणाले. विश्वनाथ दळवी यांनी स्वागत तर आनंद नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.