वृत्तसंस्था/ कोहिमा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका प्रचारसभेत पुढील 3-4 वर्षांमध्ये पूर्ण नागालँडमधून अफ्स्पा हटविला जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. नागा शांतता चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पुढाकार यशस्वी ठरणार अशी पेक्षा आहे. ईशान्येतील हिंसेत 70 टक्क्यांची घट झाली असून नागरी हानीचे प्रमाण 83 टक्क्यांनी कमी झाले आहे. पूर्व नागालँडशी निगडित काही मुद्दे असून निवडणुकीनंतर ते सोडविण्यात येतील असे शाह यांनी म्हटले आहे.
सत्तेवर आल्यास भाजप-एनडीपीपी सरकार राज्यातील सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. नागा शांतता प्रक्रिया 25 वर्षांपासून कुठल्याही तोडग्याशिवाय सुरू आहे, परंतु आता लवकरच यावर तोडगा काढला जाईल. 2014 पूर्वी नागालँडमधील लोक गोळीबार आणि रक्तपाताच्या घटनांना सामोरे जायचे. परंतु मोदी सरकारने शांतता करारावर स्वाक्षरी करत चर्चाप्रक्रियेला वेग दिला आहे. नागालँड आता शांततेसह विकासाच्या पथावर वाटचाल करत असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.