ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजला आहे. संपूर्ण शहरांत पाणी साचले आहे. दरम्यान, या सतत पडणाऱ्या पावसामुळे दौंड तालुक्यातील राजेगावच्या ओढ्यात दोन दुचाकीवरुन जाणारे 4 जण वाहून गेले आहेत. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागोजागी घरांत पाणी शिरले आहे तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. यातच दौंडमधून धक्कादायक घटना समोर आली. दोन दुचाकींवर जाणारे 4 तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी तिघांचे मृतदेह मिळाले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर एकाचा मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरू आहे.