नऊ जणांच्या मतांची बेरीज सुद्धा 550 होत नाही
सातारकरांनी पक्षीय पातळीवर केले मतदान
तीन वकील, दोन सामाजिक कार्यकर्ते, चार जण हौशे, गवसे
विशाल कदम / सातारा
पुणे पदवीधर ही निवडणूकीत सुरुवातीपासून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच रणनिती दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या ऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य आजपर्यंत राहिले आहे. त्यातच महाविकास आघाडी झाल्याने शिवसेनेची भर मिळाल्याने ही निवडणूक पूर्णपणे भाजपसाठी वजाबाकी करणारी ठरली. आजपर्यंत भाजपचा हा मतदार संघ समजला जात असला तरीही या वेळेस तो राष्ट्रवादीने हिसकावून घेतला. या निवडणुकीत विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली. जिल्ह्यातील 9 उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 550 ही होत नाही.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात या निवडणुकीत अरुण लाड आणि जयंत आसगवकर हे आमदार म्हणून निवडून आले. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीने कंबर कसली होती. अरुण लाड यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादीचे गाव पातळीवरचे कार्यकर्ते जोमाने काम करत होते. त्यांच्यात जान भरण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील हे करत करत होते. सारंग पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 58 तालुक्यातील मतदारपर्यंत अरुण लाड आणि जयंत आसगवकर यांची प्रतिभा बिंबवली गेली. त्यातच पुणे पदवीधर हा यापूर्वी भाजपचा मतदार संघ समजला जात असला तरीही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. मग कोल्हापूर असो की सातारा की पुणे. त्यातच महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेची साथ मिळाली तर दुसऱ्या बाजूला भाजपचे पुणे पदवीदरचे उमेदवार संग्राम देशमुख यांना उमेदवारी देतानाच अगोदरच भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली होती आणि शिक्षकला जितेंद्र पवार यांना पाठींबा दिला होता. प्रचारात डळमळीतपणा दिसून येत होता.शिस्त नव्हती. कार्यकर्त्यांच्या तोंडी निरुत्साह पहायला मिळत होता. सोशल कॅम्पेनियन कमी पडले. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कमी पडले.त्यास उमेदवारांचा चेहरा कारणीभूत ठरला अशी चर्चा आहे. तरीही भाजपच्या उमेदवाराने चांगली लढत दिली.
या निवडणुकीत 62 उमेदवारामध्ये 9 उमेदवार हे सातारा जिल्ह्यातील निवडणूक लढवत होते. तीन वकील, दोन सामाजिक कार्यकर्ते आणि इतर हौसे, गवसे होते. विशेष म्हणजे सातारा जिल्हावासीयांनी या उमेदवारांना पूर्णेपणे नाकारले गेल्याचे त्यांना पडलेल्या मतावरून दिसत आहे. सागर भिसे यांनी पश्चिम महाराष्ट्र कधी नव्हे पिंजून काढला. सोलापूर, सांगली येथे जाऊन त्यांनी प्रचार केला अन त्यांना अवघी 19 मते मिळाली. खटाव, माण तालुक्यातील दलित चळवळीचे संतोष कमाने यांनी ही जिल्ह्यात चांगला प्रचार केला पण त्यांना 68 मतापर्यंत मजल मारता आली.डाळमोडीचे राजीव चव्हाण यांनी तर निवडणूक काळात सोशल मीडियावर जोरदार पत्रकबाजी करून ही 46 मतावर समाधान मानावे लागले. जावली तालुक्यातील महेश महामुलकर हे तसे कधी कोणाच्या बघण्यात ना ऐकण्यात. तरीही त्यांनी जिल्ह्यातील नऊ उमेदवारांपैकी सगळ्यात जास्त मते म्हणजे 104 मते मिळवली आहेत. सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांची ही दुसरी वेळ होती.
यापूर्वी त्यांनी रासपमधून पुणे पदवीधर लढवली होती. त्यांना ही 71 मतावर समाधान मानावे लागले. सातारचा राजकीय स्टार म्हणून अभिजित बिचुकले याची ओळख आहे. त्याने 56 मते मिळवली. गणेश काटकर याला 73, नितीन माने यास 47 तर माणिक बनकर यांना 64 मतावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत डिपॉझिट खुल्या प्रवर्गासाठी 10 हजार तर मागासवर्गीय उमेदवारांकरता 5 हजार होते. दोनच उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील दिसत आहेत. जिल्ह्यातील 9 उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी पहाता जिल्हावासियांनी सपशेल त्यांना नाकारले आहे. पक्षीय पातळीवर मतदान झाल्याचे दिसून येत आहे.