रक्षाबंधन सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल महिन्याभरानंतर रविवारचे सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. जुलै महिन्यातील प्रत्येक रविवारी शांत असलेल्या बाजारपेठा, निर्मनुष्य असलेले रस्ते पुन्हा एकदा फुलून गेले. दुकाने उघडली, रस्त्यांवरून वाहने धावू लागली, नागरिकांचा गोंगाट सुरू झाला, त्यामुळे थांबलेले बेळगाव पुन्हा एकदा धावू लागले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जुलै महिन्यातील सर्वच रविवार कडकडीत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार ऑगस्ट महिन्यापासून रात्रीचा लॉकडाऊन व रविवारचा कर्फ्यू रद्द करण्यात आला. यामुळे नारिकांबरोबरच व्यापाऱयांनीही उसासा टाकला. नोकरदारवर्गाला रविवारची साप्ताहिक सुटी असते. परंतु रविवारच्या लॉकडाऊनमुळे त्यांना खरेदीसाठी घराबाहेर पडता येत नव्हते. याचा फटका व्यापाऱयांनाही बसत होता. त्यामुळे रविवारचा कर्फ्यू केव्हा रद्द होणार, याकडे नागरिकांचे लक्ष होते.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी
सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे रविवारी बेळगावच्या बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलवर राख्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गा वल बालचमूंची गर्दी झाली होती. त्याचबरोबरच बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी साडय़ा, ड्रेस तसेच साहित्याच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. त्यामुळे रविवारी sरक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठीची वर्दळ दिसून आली.
खबरदारी म्हणून अनेक दुकाने बंद
लॉकडाऊन रद्द करण्यात आला तरी अनेक दुकानदारांनी आपली दुकाने रविवारी बंद ठेवली होती. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर बाजारात नागरिकांचीही तुरळक गर्दी पहायला मिळत होती. इतर दिवसांच्या मानाने रविवारी तितकीशी गर्दी दिसून आली नाही.
बससेवा सुरू झाल्याने समाधान
लॉकडाऊनमुळे मागील काही रविवार बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला होता. परंतु लॉकडाऊन रद्द केल्याबरोबरच बससेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी होती. सोमवारी रक्षाबंधन असल्याने प्रवासी परगावी जाण्यासाठी बसला प्राधान्य देताना दिसत होते. परंतु बससेवेला नागरिकांचा अद्यापही थंडाच प्रतिसाद मिळत आहे.
सरकारच्या नव्या नियमावलीमुळे दिलासा
-मनोहर मेलगे (मेकॅनिक)
नागरिकांना रविवारी सुटी असल्याने जास्तीत जास्त वाहने दुरुस्तीसाठी या दिवशी येत असतात. परंतु जुलै महिन्यातील रविवारच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला तोटा सहन करावा लागला. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसायावर मंदीचे सावट असताना रविवारच्या कर्फ्यूमुळे त्यात भर पडत होती. परंतु सरकारच्या या नव्या नियमावलीने आम्हाला दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनीही सामाजिक अंतर राखूनच व्यवहार करणे गरजेचे
-विनायक माईनकर (नागरिक)
रविवारच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना बराच त्रास होत होता. परंतु तो रद्द केल्यामुळे आठवडाभरात राहिलेले कामे करता येत आहेत. मात्र नागरिकांनीही सामाजिक अंतर राखूनच खरेदी तसेच इतर व्यवहार करणे गरजेचे आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी उपाययोजना करीत असल्यामुळे नागरिकांनीही त्यांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.