निधी मंजूर असूनही किती दिवस थांबणार काम ?
सुधाकर काशीद / कोल्हापूर
पुरातत्वच्या कचाट्यात अडकलेला पंचगंगा नदीवरील नवा पूल खूप प्रयत्नानंतर कसाबसा सुटला पण आता पुरातत्वच्या कचाट्यात चांगलाच अडकून बसला आहे. या घाटाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर झाले. पाच कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमाही झाले. पुरातत्व खात्याने ना हरकतपत्रही दिले. पण आत्ता पुन्हा घाट ब्रह्मपुरी टेकडी पासून शंभर मीटरच्या आत येत असल्याचे कारण सांगून काम थांबले आहे. ज्या कारणाने पंचगंगा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामात जे अडथळे आले तसेच अडथळे आता पंचगंगा घाटाच्या वाट्याला आले आहेत.
पंचगंगा नदीवरील घाट हे अप्रतिम सौंदर्य स्थळ आहे. विशेष हे की घाटाचा पुर्वेकडील कोपरा अनेक चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातूनही साकारला आहे. प्रख्यात चित्रकार आबालाल रहिमान यांचे याच घाटाचे जलरंगातील चित्र तर पुरातत्त्व संग्रहालयाची शान ठरले आहे. या घाटाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास निधीतून 28 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचा आराखडा वास्तुरचनाकार बंटी नागेशकर यांनी तयार केला. भविष्यात कोणाचीही हरकत नसावी म्हणून पुरातत्व खात्याचे ना हरकत पत्र घेण्यात आले. सर्व पूर्तता झाल्यानंतर निविदा काढण्यात आली. त्यामुळेच टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. कंत्राटदाराने दगड घडवण्यासही सुरुवात केली.
दरम्यान पंचगंगा नदीवरील नवीन पुलाच्या जागेचा मुद्दा वादाचा ठरला. कोल्हापूर व आसपासच्या गावातील लोकांनी जनआंदोलनाचा रेटा लावला. केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभागाने त्यानंतर हालचाली सुरू केल्या. खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीतील यंत्रणा हलवली. पुरातत्त्वच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भेट दिली. पुलाच्या उर्वरित बांधकामाला अखेर परवानगी मिळाली. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. पण त्याच काळात घाट संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात होताच पुरातत्व खात्याने घाट ब्रह्मपुरी टेकडी या पुरातत्त्वच्या जागेपासून शंभर मीटरच्या आत येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला व हा घाट पुरातत्वच्या नियम व कचाट्यात अडकून बसला. यानिमित्ताने एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
ज्या घाटाच्या बांधकामाला पुरातत्व खात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले, त्याच घाटाला आता आक्षेप का घेतला गेला ? घाट पूर्वी ब्रह्मपुरी पासून शंभर मीटरमध्ये येत नव्हता तो आता 100 मीटर मध्ये कसा आला ? नकाशा पूर्वीचा खरा की आत्ताचा खरा, असे हे प्रश्न आहेत. पुरातत्वच्या अटीमुळे सारे काम थांबले आहे. या पावसाळ्यात घाटाच्या बुरुजाचा मोठा भाग ढासळला आहे. घाटाचा पूर्व कोपरा म्हणजे कोणीही यावे आणि कितीही कचरा टाकावा यासाठीची जागा झाली आहे. त्यामुळे पुरातत्वच्या कचाट्यात सापडलेला हा घाट मुक्त करून त्याचे संवर्धन करण्यासाठी पुन्हा कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन रेटा लावण्याची गरज आहे. ब्रम्हपुरी या प्राचीन अवशेषाच्या परिसराचा नेमका नकाशा या निमिताने पुन्हा अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आता घाटाचे काम थांबले असले तरी इतर जागेत मोठा भराव रोज टाकला जात आहे.