राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सदस्यांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) सदस्यांना एका महत्वपूर्ण निर्णयाद्वारे केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. या योजनेत सहभागी होण्याचे अधिकतर वय आता 65 वरुन 70 वर्षे करण्यात आले आहे. तसेच आपली जमा झालेली एकंदर पेन्शन (निवृत्ती वेतन) 5 लाख रुपयांच्या खाली असेल तर ती एकचवेळी काढता येणार आहे. त्यासाठी ऍन्युईटी खरेदी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
निवृत्ती वेतन निधीत (पेन्शन फंड) जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियमांमध्ये हे आणि इतरही काही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी पूर्ण पेन्शन काढण्याची मर्यादा 2 लाख रुपये होती. ज्यांची एकत्रित पेन्शन दोन लाख रुपयांच्या वर आहे त्यांना त्यातील 80 टक्के भाग कायमस्वरुपी निवृत्ती खात्यात (परमनंट रिटायरमेंट अकाउंट) गुंतवावा लागत होता. उरलेली केवळ 20 टक्के रक्कम त्याला एकाचवेळी काढता येत होती.
नव्या नियमांचा लाभ ज्यांची एकंदर पेन्शन कमी आहे, अशा सदस्यांना होणार आहे. कोरोनाच्या दुसऱया उद्रेकामुळे ज्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे, त्यांना या बदलेल्या नियमांचा जास्त लाभ होणार आहे. त्यांना त्यांच्या खर्चासाठी आता अधिक रक्कम उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.