वार्ताहर/ देवरुख
बामणोली पाठोपाठ पूर येथील महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या या 2 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. पूर येथील महिला ही मुंबईतून पतीच्या कार्यासाठी पूर गावी आली होती. तीला रत्नागिरी येथील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तिचा अहवाल नुकताच प्राप्त झाला तो पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कात आलेल्या तिघांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. आणखी किती जणांच्या ती संपर्कात आली होती याचा मागोवा घेतला जात असल्याची माहिती तहसीलदार सुहास थोरात यांनी दिली आहे.
पतीचे निधन झाले म्हणून ही महिला ही मुंबई सायन प्रतिक्षानगर येथून गावी आली होती. 27 एप्रिलला ती आल्यानंतर तीला क्वॉरंटाइन करण्यात आले. त्यानंतर 28 रोजी तीला रत्नागिरी येथील सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावाधाव सुरु झाली आहे. पूर गाव सर्वेक्षणाचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. दोन टिम त्यासाठी कार्यरत करण्यात आल्या आहेत. ही पथके 30 ते 35 घरांना दररोज भेट देणार आहेत. गावातील आजारी व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
तसेच गावात कोणी आजारी असतील तर त्यांच्या आजाराचा प्रकाराचीही नोंद केली जाणार आहे. आरोग्य पथक गावात दररोच तपासणी करणार आहे. ग्रामकृती दलालाही सतर्क करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आल्या होत्या याचा मागोवा घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसर सील करण्यात आला आहे. येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही महिला या मुंबईतून आल्या होत्या. त्यामुळे मुंबई या हॉटस्पॉट भागातून आलेल्या व येणाऱयांवर यंत्रणांची करडी नजर असणार आहे.