आमदार अरग ज्ञानेंद्र यांच्या समितीला 30 जूनपूर्वी द्यावा लागणार अहवाल
बेंगळूर : राज्यात शुद्ध पेयजल केंद्र सुरू करणे आणि त्यांच्या देखभालीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आमदार अरग ज्ञानेंद्र यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी हा आदेश दिला आहे. 30 जूनपूर्वी चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना या समितीला देण्यात आली आहे.
आमदार अरग ज्ञानेंद्र यांच्या समितीमध्ये आमदार आणि विधानपरिषद सदस्य अशा एकूण 20 जणांचा समावेश आहे. आमदार अप्पच्चु रंजन, ए. एस. पाटील, विरण्णा चरंतीमठ, के. शिवनगौडा नायक, बी. सी. नागेश, हालप्पा आचार, राजेश नायक, के. जे. जॉर्ज, कृष्णभैरेगौडा, यु. टी. खादर, ईश्वर खंड्रे, ए. टी. रामस्वामी, वेंकटराव नाडगौडा तसेच विधानपरिषद सदस्य एस. रवी, विजय सिंग, एच. एम. रमेशगौडा, एस. व्ही. संकनूर यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांनी पेयजल केंद्रे निर्मितीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी समिती नेमली आहे.