काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, वादग्रस्त पोलिस भरती प्रक्रीया बंद ठेवावी अशी मागणी काँग्रेसने मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व निवडणूक अधिकाऱयांकडे केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी या संदर्भात मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व निवडणूक अधिकाऱयांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
भाजप सरकारने नोकऱयांचा जो घोटाळा केला आहे, त्यातून पात्र उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे आणि आपल्या नातेवाईकांना नोकऱया दिल्या आहे आणि विकल्याही आहेत, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. भाजपची पदाधिकाऱयांची मुले शारिरीक चांचणीत नापास होवूनही त्यांना नोकऱया कशा देण्यात आल्या आहेत, त्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
पोलिसांच्या नोकऱया विकण्याच्या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या पोलिस महासंचालकांना तातडीने दिल्लीत बदली करण्यात आली होती हे सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्याला रोखू नाही शकत नाही आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव प्रयत्न करणार असे चोडणकर म्हणाले.
आयआरबी जवान अनिल बांदेकर जे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा विभागमध्ये काम करत आहेत, त्यांची नियुक्ती पोलिस उपनिरीक्षकपदी केलेली आहे जो शारीरिक परीक्षेत नापास झाला होता आणि लेखी चाचणीत 100 पैकी 98 गूण त्याला मिळाले होते. आणखी एक उदाहरण देताना ते म्हणाले की आदित्य मुकुंद गाड हा उमेदवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी शारीरिक चाचणी परीक्षेत नापास झाला होता, तरीही त्याला लेखी परीक्षेत बसण्याची संधी दिली आणि 100 पैकी 98 गुण घेऊन तो पास झाला, अशी कित्येक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. आचारसंहिता लागू असताना ही प्रक्रिया पुर्ण होण्यास देवू नये असे ते म्हणाले. ही प्रक्रिया थांबवली नाही तर उच्च न्यायालयात आव्हान देणार, असे चोडणकर म्हणाले.