गोव्याच्या आधुनिक विकासाचे शिल्पकार : 24 मार्च 1972 रोजी पासून राजकीय कारकीर्द
प्रतिनिधी / पणजी
गोव्याच्या राजकारणाचे अध्वर्यू आणि पितामह म्हणून ओळखल्या जाणारे प्रतापसिंह राणे हे आज आपल्या राजकीय कारकीर्दीच्या व विधानसभा सदस्यत्वाच्या 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 24 मार्च 1972 रोजी राणे यांनी गोवा विधानसभा सभागृहात आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. देशात सलग पन्नास वर्षे निवडून येणारे प्रतापसिंह राणे हे सर्वात दीर्घकालीन विधिमंडळपटू असल्याचे सिद्ध झाले आहे.
यासंदर्भात प्रतापसिंह राणे यांच्याशी संपर्क साधला असता आणि आपल्या या दीर्घकालीन यशाचे गमक काय! असे विचारले असता, राणे म्हणाले की जनतेचे प्रेम आणि आपण जनतेची केलेली प्रामाणिक सेवा यामुळेच सत्तरीच्या जनतेने आपल्यावर उदंड प्रेम केले आणि त्यामुळे आपण त्या जनतेचे अत्यंत आभारी आहोत.
जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे
नव्याने राजकारणात येणाऱया सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जनतेशी तुम्ही नेहमीच प्रामाणिक राहिले पाहिजे, अन्यथा जनता तुम्हाला पुढील निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कोणीही जनतेला गृहीत धरून चालणार नाही. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वश्रेष्ट असते. राजकीय क्षेत्रात वावरणाऱया जनता सातत्याने पाहत असते.
भाऊसाहेबांनी घरी येऊन दिली उमेदवारी
आपण आपली राजकीय कारकीर्द मनात कोणतीही इच्छा न बाळगता सुरू केली होती. 1972 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्याला साखळी येथे घरी येऊन उमेदवारी दिली आणि राजकारणात आणले. आपल्याला पहिल्याच निवडणुकीनंतर मंत्री बनविले. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर यांच्या सरकारमध्येदेखील आपण मंत्री होतो.
नंतर आपल्याला जनतेचा जास्त प्रतिसाद मिळाल्यानंतर ताईंनीही आपल्याला पुढील निवडणुकीत उमेदवारी द्यायची नाही, असे ठरवले होते. आपण त्याच दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिथून आपली जी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती आजतागायत आपण त्या पक्षामध्ये राहिलो आणि त्या पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱया आपण स्वीकारलेल्या आहेत, असे ते म्हणाले.
नव्याने राजकारणात प्रवेश करणाऱयांनी प्रतापसिंग राणेंकडून बरेच काही शिकावे लागेल. 1972 मध्ये विधानसभेत प्रवेश केलेल्या प्रतापसिंह राणे यांनी आयुष्यात कधीही पराभव पत्करलेला नाही. एखाद्या मतदारसंघातील मतदारांनी एखाद्या आमदारावर शतदा प्रेम करावे त्याप्रमाणे प्रतापसिंह राणे यांच्यावर भरभरून प्रेम केले आणि राणे यांनी देखील सत्तरीच्या जनतेवर उदंड प्रेम केले.
देशात एकमेव आमदार
देशात सध्या दीर्घकाल विधानसभा किंवा लोकसभेमध्ये सेवा बजावणाऱयांची संख्या तशी कमी नाही. परंतु आजही आमदारकीच्या 50 व्या वर्षात पदार्पण करणारे प्रतापसिंह गाणे हे देशातील एकमेव विद्यमान आमदार आहेत. या अगोदर तामिळनाडूतील डीएमकेचे एम. करुणानिधी यांनी 61 वर्षे आमदारकी सांभाळली. केरळमधील एका नेत्याने जवळपास 56 वर्षे आमदारकी सांभाळली. ही दोन्ही माणसे आज हयात नाहीत. महाराष्ट्रामधील देखील एका माजी आमदाराने 53 वर्षे आमदारकी सांभाळली होती. परंतु सलग सर्वच्या सर्व निवडणुका जिंकून आजही आमदार म्हणून विधानसभेचे कामकाज पाहणारे प्रतापसिंह राणे हे देशातील एकमेव ज्येष्ट आणि सुवर्ण महोत्सव साजरा करणारे आमदार ठरलेले आहेत. ते गोमंतकीय असल्यामुळे साऱया गोमंतकीय जनतेला ही एक अत्यंत आनंदाची आणि तेवढेच अभिमानाची बाब आहे. 1972 मध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे प्रतापसिंह राणे 1980 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री बनले. 1984 च्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. 1994 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर इसवी सन 1999 मध्ये ते सभापती बनले. त्यानंतर 2005 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. 2007 मध्ये त्यांनी सभापती म्हणून काम पाहिले. 2012 पासून त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले अशी प्रतापसिंह राणे यांची गेल्या पन्नास वर्षाची कारकीर्द पाहता आयुष्यात कधीही त्यानी पराभव चाखला नाही आणि सत्तरीतील जनतेने त्यांना सातत्याने विजयी केले. सहसा कधीही एवढा दीर्घ काळ एकाच नेत्याला आपल्या मतदारसंघात निवडून देण्यास जनता राजी नसते, परंतु प्रतापसिंह राणे हे त्यास अपवाद ठरलेले आहेत. गोव्याच्या इतिहासात प्रतापसिंह राणे यांनी स्वतःचा एक दीर्घकालीन विधानसभेत राहण्याचा इतिहास रचला आहे. आज ते आमदारकीच्या कारकीर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दिमाखाने प्रवेश करीत आहेत. गोव्याच्या इतिहासातील प्रतापसिंग राणे हे एक सुवर्णपान ठरावे, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
इंदिरा गांधींनी केंद्रात येण्याची दिली होती ऑफर
प्रतापसिंह राणे यांच्या गोव्यातील एकंदरीत राजकीय कारकीर्दीचा आढावा घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना केंद्रात येण्याचा सल्ला दिला होता परंतु राणे यांनी आपल्याला गोव्याची सेवा बजवायची आहे आणि मी मुळातच शेतकरी आहे. आपल्याला आपल्या शेती-बागायतीची देखील काळजी आहे, असे सांगून त्यांनी केंद्रात जाण्याचे टाळले, अन्यथा केंद्रस्थानी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा अवश्य मिळाला असता, असा गौप्यस्फोट प्रतापसिंह राणे यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना केला.