वडी येथे फळबाग लागवड आणि गांडूळखत प्रकल्प कार्यक्रम.
वार्ताहर / औंध
पूर्वी हापूस केशर आंब्यासाठी शेतकऱ्यांना कोकणावर अवलंबून रहावे लागत होते. परंतु फळबाग लागवडीमुळे आता ही सुविधा आपल्या बांधापर्यंत पोहचली आहे. ग्रामीण भागात हापूस केशर आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.कृषी विभागाने राबवलेल्या फळबाग लागवड योजनेचा शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खटाव पंचायत समितीच्या सभापती रेखा घार्गे यांनी केले.
कृषीसंजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगाचे औचित्य साधून कृषी विभागाने वडी येथे फळबाग लागवड, गांडूळखत प्रकल्प उद्घाटन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सभापती बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नागरिक जे.बी जाधवशेठ, सरपंच अनिल सुर्यवंशी, चेअरमन सचिन जाधव, मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, कृषी पर्यवेक्षक विजय वसव, सहाय्यक मोहन मदने, यु. एम तिकुटे, आर. एस ठोंबरे ग्रामसेविका एस. एस. देटके, गणेश येवले, विजय जाधव, संतोष येवले विश्वजित येवले, प्रसाद येवले, किशोर येवले, अजित येवले, विष्णू येवले, ग्रामस्थ उपस्थित होते.
घार्गे म्हणाल्या कि मंडल कृषी विभागाने कोरोनाच्या महामारीत प्रत्यक्ष बांधापर्यंत जाऊन विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. पंचायत समितीच्या कृषी विभागाचे वतीने सुध्दा विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कृषीसहाय्यक मोहन मदने यांनी प्रास्ताविक केले. सरपंच अनिल सुर्यवंशी यांनी आभार मानले.