कुडचडेतील बैठकीत काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश राव यांचे उद्गार : उडय़ा मारणाऱयांना जनताच धडा शिकवेल
प्रतिनिधी /कुडचडे
आजपर्यंतचा इतिहास सांगतो की, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका जिकलेल्या आहेत व स्वबळावर सरकार स्थापन केलेले आहे. गेल्या वेळेसही काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आले होते, पण काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी वेळ न देता कमी उमेदवार असलेल्या पक्षाला प्राधान्य दिले गेले. त्यानंतर स्थापित झालेल्या सरकारने जवळ केलेल्या आमदारांना कुठली वाट दाखविली हे सर्व जनतेला माहिती आहे. तसेच ज्या प्रकारे काही काळानंतर अमिषाच्या पोटी दहा आमदारांनी लोकांची दिशाभूल करून काँग्रेस पक्षातून उडी मारली ती एक लज्जास्पद घटना असून मतदार ही घटना कधीच विसरणार नाहीत. त्याचबरोबर ज्यांनी ही उडी मारली त्यांना काँग्रेस ढुंकून सुद्धा बघणार नाही, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.
काँग्रेसच्या कुडचडे मतदारसंघातील बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर गटाध्यक्ष पुष्कल सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, बाळकृष्ण होडारकर, अमित पाटकर, हर्षद गावस देसाई व इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे निवडून आल्यावर दुसऱया पक्षात उडी मारणाऱयांना जनताच धडा शिकवेल. तसेच काँग्रेस यावेळी जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवारी जाहीर करेल. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष बळकट आणि संघटित करण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे राव म्हणाले.
राज्यातील भाजप सरकार खास करून मुख्यमंत्री प्रमोद सावंत परत परत सांगतात की, खाण व्यवसाय बंद पडण्यास कारण काँग्रेस पक्ष आहे. पण आपण जनतेला सांगू इच्छितो की, ज्या वेळेस खाण व्यवसाय सुरू होता तेव्हापासून आजपर्यंत आपली स्वतःची अशी खाणींशी संबंधित कोणतीच यंत्रणा वा इतर वस्तू नाही. तरीही राज्यात आपल्याबद्दल अफवा पसरविली गेली. पण अफवा पसरविताना ‘सर्वोच्च न्यायालय नव्हे, तर आपण खाण व्यवसाय बंद पडला’ असे वाक्मय जे विधानसभेत बोलले गेले होते ते विसरले गेले असे वाटते. पण खोटे आरोप केले म्हणून एखादी व्यक्ती खोटी बनत नाही. हे त्यांना समजायला कदाचित अजून वेळ लागेल. जनतेला सत्य काय ते सांगण्याची गरज नाही. त्यावेळेस योग्य निर्णय घेतला असता, तर आज गोव्याच्या खास करून कुडचडे, सावर्डे, मडगाव येथील बाजारपेठा अशा अत्यंत खालावल्या नसत्या. आज प्रत्येक जण म्हणत आहे की, काँग्रेसचे सरकार असताना काही तरी व्यवसाय होता, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जनतेत भाजपविरोधी भावना आज भाजप सरकार जे काही करत आहे त्यातील एक तरी गोष्ट लोकहितार्थ आहे का ते त्यांनी सांगावे. आपण पाच वर्षे राज्य चालविले. पण कोणताच भेदभाव केला नाही. कोण विरोधी पक्षाचा, कोण आपल्या पक्षाचा हे बघितले नाही. सर्वांना समान मान देण्याचा प्रयत्न केला, कोणाच्या पोटावर कधीच लाथ मारली नाही. गेले कित्येक दिवस आपण राज्यात विविध ठिकाणी लोकांच्या भेटी घेत आहे. त्यात लोकांकडून एकच सूर ऐकू येऊ लागला आहे आणि तो म्हणजे परत भाजप सरकार राज्यात नको. कुडचडेवासियांनी एकत्र येऊन भाजप सरकारला हाकलून लावण्याचा निर्धार केला, तर ते अजिबात कठीण नाही, असे कामत पुढे म्हणाले. प्रत्येक जण कुडचडेतील उमेदवारीसंबंधी विचारू लागला आहे. पक्ष शेवटी एकाच व्यक्तीला उमेदवारी देणार हे कार्यकर्त्यांनी विसरता कामा नये. त्यामुळे संघटित राहून कार्य करणे सवात महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. चोडणकर, पाटकर, गावस देसाई, होडारकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाने जनतेसाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.