पणजी / प्रतिनिधी
गोव्याच्या फेणीला वारसा असुन, फेणीच्या पारंपारिक उत्पादन प्रक्रियेला एक वैशिष्टय़ आहे. काजूचे फळ गोळा करण्यापासुन ते फेणीची भट्टी लावण्याची नाविन्यपूर्ण प्रक्रिया ही एक कला आहे. धनाडय़ मद्य सम्राटांना या व्यवसायात प्रवेश देऊन सदर व्यवसायाचे बाजारीकरण करण्यासाठी सरकारने अबकारी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न करु नयेत असा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत “गोंयचे दायज” ही योजना सुरू करुन गोव्यातील पारंपारीक व्यवसाय जपून ठेवण्याचे प्रयत्न काँग्रेस सरकारने केले होते. आज भाजप सरकार आज सर्व पारंपारिक व्यावसायीकांच्या पोटावर पाय ठेवून धनाडय़ उद्योगपतींचा फायदा बघत आहे असा गंभिर आरोप दिगंबर कामत यांनी केला आहे.
सरकार अबकारी कायद्यात दुरूस्ती करुन, नियम बदलण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती मला मिळाली असुन, भाजप सरकारने असे केल्यास त्याचा गंभिर परिणाम गोव्यावर होणार आहे.
आज गोवा काजू फेणी उत्पादक व बोटलर्स असोसिएशनकडे फेणीची जिआय मान्यता असुन, सदर संघटणा आज पारंपारिक काजू उत्पादक तसेच काजू फेणी व इतर मद्य उत्पादक यांचे प्रश्न सातत्याने मांडत आहे व समस्यांवर तोडगा काढण्यांचा प्रसत्न करीत आहे. सरकारने सदर संघटणा तसेच इतर सबंधितांना विश्वासात घेवूनच पुढचे पाऊल टाकावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
गोव्यातील पारंपारिक काजू फेणी उत्पादकांचे हित जपणे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. काजू फेणी उत्पादन व्यवसायाचा वारसा पूढे चालू ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. गोवा सरकारने अबकारी कायद्यात बदल करुन, मद्य सम्राटांना काजू फेणी उत्पादन व्यवसायात प्रवेश करण्यास वाट मोकळी करुन दिल्यास गोव्यातील पारंपारिक व्यावसायींकावर तो घाला ठरेल असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.