प्रतिनिधी / पणजी
गोमंतकीय लोकच 200 युनिटपेक्षा कमी वीज दर महिन्याला वापरतात असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. असे असेल तर जे लोक 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी मोफत वीज द्यावी. जर आप पक्ष सत्तेत आला तर 48 तासांच्या आत आम्ही 200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱयांना मोफत वीज देणार आणि 200 युनिट ते 400 युनिटपर्यंत वीज वापरणाऱया उपभोक्त्यांना वीजबिलात 50 टक्के सूट दिली जाणार आहे. असे आश्वासन आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी पत्रकार परीषदेत दिले.
200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱयांना मोफत वीज व 200 युनिट ते 400 युनिटपर्यंत वीज वापरणाऱया उपभोक्त्यांना वीजबिलात 50 टक्के सूट दिल्यानंतर 200 युनिट ते 400 युनिटपर्यंत वीज वापरणाऱया उपभोक्त्यांना वीजबिलात 50 टक्के सूट दिल्यानंतर राज्यातील 90 टक्के वीज ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. असेही तिळवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. प्रमोद सावंतचे सरकार फसविणारे आणि खोटारडय़ांचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी पाच हजार रुपये देण्याचा दावा केला होता त्याला अनुसरून जनतेने आपले बँक खाते तपासून पाहावे आणि पैसे आलेले आहेत की नाहीत याची खातरजमा करावी. जर आले नाही तर वेळ आली आहे की प्रत्येक गोवेकराने हे विचारायला हवे की पैसा अथवा निधी कोणाच्या खिशात जात आहे? बजेटप्रमाणे गोवा सरकार 1.40 लाख प्रत्येक गोवेकरावर खर्च करीत आहे आणि तसे असेल तर हा पैसा कुठे जातो हे स्पष्ट करावे अशी मागणी देखील तिळवे यांनी यावेळी केली.
दिल्लीत आम आदमी पक्ष प्रत्येक व्यक्तीवर 30 हजार रूपये खर्च करतो आणि असे असूनही कित्येक सुविधा जनतेला देण्यात येतात आणि गोव्यात सरकार दावा करते की 1.40 लाख रूपये प्रत्येक एका गोमंतकीयाच्यामागे खर्च केले जातात पण लोकांना काहीही सुविधा मिळत नाहीत. असेही तिळवे यांनी पुढे सांगितले.
आप पक्ष चर्चेसाठी कधीही, कुठेही तयार
वीज मंत्री निलेश काब्राल यांनी स्वतः ज्या सार्वजनिक वादविवाद आणि खुल्या चर्चेचे आव्हान आम आदमी पक्षाला दिले, त्याच चर्चेपासून ते दूर पळून गेले. आता देखील वीज मुद्यावर चर्चा करण्यासाठी आप कुठल्याही वेळी कुठेही यायला तयार आहे. निलेश काब्राल यांनी तारीख, वेळ आणि जागा चर्चेसाठी निश्चित करावी आणि वाल्मिकी नाईक त्यात सहभागी व्हायला कधीही तिथे येतील असे सुरेल तिळवे यांनी वाल्मिकी नाईक यांनी दिलेल्या खुल्या सार्वजनिक चर्चेचे आव्हान काब्राल यांनी स्वीकारल्याचे पार्श्वभूमीवर सांगितले.