राणी चन्नम्मा विद्यापीठाचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु बुधवार दि. 7 रोजी परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तशा आशयाचे पत्र प्रत्येक महाविद्यालयाला पाठविण्यात आले आहे. बस बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि. 7 रोजी होणारी पदवी विद्यार्थ्यांची परीक्षा आता गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तर 7 रोजीच होणारी पदव्युत्तर परीक्षा 26 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. उर्वरित सर्व पेपर वेळापत्रकानुसारच घेतले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून महाविद्यालयांना देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना फोन तसेच व्हॉट्सऍपवरून पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.